आशिष शेलार यांची घोषणा, मुंबईत ‘अब की बार चारसो पार’चा नारा

भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त मुंबई भारतीय जनता पार्टी तर्फे ६ एप्रिल रोजी चारशे कार्यक्रमाचे आयोजन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला “अब की बार चारसो पार” हा नारा बुलंद करण्याचे नियोजन आहे. तसेच हिंदू नववर्षानिमित्त गुढीपाडव्या दिवशी राम मंदिराच्या निर्माणाच्या पार्श्वभूमीवर हिंदुत्वाची गुढी उभारून स्वागत करूया असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केले.

मुंबई भाजपा कोअर कमिटीची बैठक रंग शारदा येथे पार पडली. त्यानंतर आ. ॲड. आशिष शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या बैठकीला कॅबिनेट मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा, खा. गोपाळ शेट्टी, खा. मनोज कोटक, आ. अतुल भातखळकर, आ. प्रविण दरेकर, आ. प्रसाद लाड, आ. मनीषाताई चौधरी, आ. अमित साटम, आ. योगेश सागर, आ. सुनील राणे, महामंत्री संजय उपाध्याय उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, मुंबईतील महायुतीचे सहाही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याकरिता आवश्यक ते कार्यक्रम राबवण्यासंबंधी चर्चा बैठकीत झाली. महायुतीच्या प्रचारात आम्ही सर्वात पुढे राहू. गुढी पाढव्याला हिंदुत्वाची गुढी उभारून १ हजार ठिकाणी बैठका आणि जनसभांचे नियोजन केले आहे. सीएए च्या समर्थनात भाजपा मैदानात उतरणार आहे.

आशिष शेलार पुढे बोलताना म्हणाले की, १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान संरक्षक भाजपा कार्यकर्ता अशा आशयाचे १४ महत्त्वाचे मेळावे तसेच १४० वस्त्यांमध्ये संवादाचे कार्यक्रम आम्ही करणार आहोत. रामनवमीनिमित्त कल्पक कार्यक्रम तसेच मुंबईतील वस्त्यांमध्ये कार्यक्रम घेण्यात येतील. महावीर जयंती आणि हनुमान जयंती या निमित्तानेही कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीबद्दल विचारले असता आशिष शेलार म्हणाले की, एनडीए मजबुत होतेय, मोदीजींचा परिवार मोठा होतोय आणि मुंबईसह राज्यात इंडी आघाडीला पराभूत करणारी महाशक्ती महायुतीत परावर्तित होतेय याचा आम्हाला आनंद आहे.

पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची

पळवणं आणि पळणं ही दोन्ही पळपुटेपणाची लक्षणं उबाठा सेनेची आहेत. उबाठा सेनेला आव्हान आहे की, हिंमत असेल तर निवडणुकीत एकटे आमच्यासमोर या.आपल्या स्वार्थासाठी वडिलांचे विचार, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धवजींनी सोडले, मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी अहमद पटेल ते शर्जील उस्मानी यांच्यासमोर मुजरा केला, त्यांना हिंदुत्ववादी मतदारांनी झिडकारलंय, हे सत्य चित्र आहे. स्वतःच्या पक्षासाठी गर्दी जमू शकत नाही म्हणून आता २२ पक्षांना एकत्र घेऊन शिवाजी पार्कवर गर्दी जमवावी लागते, अशी उद्धवजींची आजची अवस्था आहे अशीही टीका मुंबई भाजपा अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार यांनी केली.

About Editor

Check Also

माधुरी मिसाळ यांची माहिती, १० हजार बसची आवश्यकता बेस्ट बससेवेबाबत मुंबईतील आमदारासमवेत बैठक घेणार

मुंबईतील बेस्ट बससेवाबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी मुंबईतील सर्व स्थानिक आमदार यांच्यासमवेत बैठक घेण्यात येईल. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *