मराठी नाटकाची पायाभरणी विष्णुदास भावे यांनी केली यामध्ये काही दुमत नाही. पण त्यापुर्वी लोककला मधून नाटक या कलाकृतीचे काही संदर्भ सापडत असून त्याबद्दल लेखन आणि चर्चा सुरु आहेत. त्यामुळे याबाबत एक सर्वंकष अभ्यास आणि संशोधन होण्याची गरज आहे. या कामी अखिल भारतीय नाट्य परिषदेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज येथे केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या नाट्य महोत्सवाचा समारोप आज मान्यवरांच्या उपस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह भायखळा येथे संपन्न झाला. समारोप प्रसंगी नाट्य जागर मधील विजेत्या ०३ विशेष एकांकिकांचे सादरीकरण करण्यात आले. समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष शेलार आणि सचिव विकास खारगे यावेळी उपस्थित होते.
यावेळी अॅड आशिष शेलार म्हणाले की, नाट्य परिषदेने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने विविध भाषांमधील नाटकांचा महोत्सव आयोजित केला हे अत्यंत स्तुत्य उपक्रम असून विविध भाषांमधील विचार, नाटक, काव्य, कथा आणि त्यातील सांस्कृतिक विविधता याचे अदान प्रदान होणे आवश्यक आहे. मराठी भाषा ही नेहमीच अन्य भाषेतील शब्द सामावून घेतच आली आहे तसेच मराठी भाषेतील अनेक शब्द अन्य भाषांनी ही लिलया सामावून घेतले आहेत. आपले मराठी नाटक हे शंभर वर्षांहून मोठी परंपरा असलेले आहे. विष्णुदास भावे यांनी नाटकाचा रंगमंचावरील पहिला अविष्कार सादर केला यात काही दुमत नाही. पण आता नवनवीन माहिती समोर येत असून लोककलांमध्ये नाटकाची मुळे आहेत असे लेखन समोर येते आहे. त्यामुळे अशा प्रकारचे संशोधन करण्यासाठी एखादा अभ्यास गट नाट्य परिषदेने स्थापन करुन याबाबत संशोधन करावे सरकार या कामी पुर्ण मदत करेल, असे आश्वासनही यावेळी दिले.
या पूर्वी अस्तित्वात असलेल्या नाट्य आणि त्या संदर्भातील इतर कलांचे संशोधन अखिल भारतीय नाट्य परिषदेने करून त्या रचना जगासमोर मांडाव्यात. त्यासाठी विशेष तज्ज्ञांची समिती करावी,त्याचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करेल#Maharashtra pic.twitter.com/hAaja7LHW9
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) March 2, 2025
Marathi e-Batmya