मुंबई: प्रतिनिधी
मुंबईसह राज्यातील लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे या कामगारांना योग्यरित्या त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यात क्लार्क, टायपिस्ट, असिस्टंट यांच्याबरोबर अवर सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याने आमचं डिव्हॅल्युएशन केले की काय असा सवाल या नियुक्त अवर सचिवांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
नियुक्त करण्यात आलेल्या अवर सचिवांमध्ये श्रीकांत आंडगे, शिंदे, देशपांडे, निकम, काळे, गणेश पवार, चेतन निकम, प्रशांत पाटील, विशाल मदने, नाईक, मोटे, विवेक कुंभार, श्रीकृष्ण पवार, अमोल कणसे, खडे, दिपक पोवळे, संदिप ढाकणे, रविंद्र औटे यांचा समावेश आहे.
हे सर्व १९ जण राज्य सरकारने जारी केलेल्या ५ टक्के कर्मचाऱ्यांच्या धोरणानुसार रोटेशन पध्दतीने मंत्रालयात येवून आपली जबाबदारी पाडत आहेत. तरीही पोलिसांच्या मदतीसाठी आम्हाला नियुक्त करण्यात आल्याने मंत्रालयात अवर सचिव म्हणून कार्यरत असणारे आम्ही तिकडे जावून कारकून दर्जाचे काम करायचे का? असा सवाल या १९ जणापैकी काहीजणांनी व्यक्त केला.
त्याचबरोबर ग्रामविकास विभागातील अवघे ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती या कामासाठी करण्यात आली असून सर्वात मोठा विभाग म्हणून ओलखल्या जाणाऱ्या ग्रामविकास विभागात ४० वर्षाच्या आतील फक्त ५ च कर्मचारी कसे आढळून येतात असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
Marathi e-Batmya