उद्धवजींची मराठी भाषा आम्ही जवळून अनुभवतोय. त्यांची मराठी भाषा वेगळी आहे. हळूहळू बोलत असताना ते गुदगुल्या करतात. शालजोडीतून मधूनच समोरच्याचं वस्त्रहरण करणारी उद्धव ठाकरेंची मराठी भाषा आहे. हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अस्त्र आहे. आदित्य ठाकरे देखील चांगलं मराठी बोलतात. महाराष्ट्राला आपलंसं करून घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये असल्याचे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले.
गुढी पाडवा दिनाच्ये औचित्य साधार मुंबईत आज मराठी भाषा भवन इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषेचं महत्व विषद करून सांगतानाच नव्या पिढीला मराठी भाषेबद्दल अनास्था असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त करत म्हणाले की, इतर भाषिक भेटतात, तेव्हा एकमेकांशी स्वत:च्या मातृभाषेत बोलतात. पण तुम्ही मुंबईत अनुभव घ्या. दोन मराठी माणसं भेटली, तर तुम्हीच सांगा ते एकमेकांशी कोणत्या भाषेत बोलतात? सुरुवातीला इंग्रजीत बोलतील. मग त्यांचं इंग्रजी थकतं. मग दोघंही अडखळतात. मग हिंदीवर येतात. मग हिंदीतून सुरूवात होते. त्यापेक्षा दोघांनी जर मराठीतच बोललं तर? मराठी भाषेबद्दल आपल्याला प्रेम नाही का? त्याबद्दल न्यूनगंड असेल, तर आपल्या भाषेचा विकास कसा होईल? मुंबईकरांच्या सवयीबद्दल चिमटा काढत उपरोधिक सवालही त्यांनी केला.
यावेळी मराठी भाषा भवनासाठी महसूल विभागाने तातडीने जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अजित पवार यांनी बाळासाहेब थोरातांचे आभार मानले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, बऱ्याचदा एखाद्या विभागाची जागा एखाद्या प्रकल्पासाठी हवी असेल, तर त्या विभागाच्या मंत्र्याला वाटतं की आपल्याच जवळजी जागा द्यायची आहे. तो आखडूनच बसतो. देतच नाही. काही ना काही कारणं काढतो. मला कळतच नाही. मी म्हणतो आरे किती दिवस? जोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी तुमच्याकडे विभाग दिलाय, तोपर्यंत विभाग आहे. उद्या काढून घेतला तर दुसऱ्याकडे जाईल. तरी हा एक मनुष्यस्वभाव आहे. त्याचा अनुभव गेल्या ३० वर्षाच्या राजकीय जीवनात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आला आहे. मुख्यमंत्र्यांनाही गेल्या अडीच वर्षांत त्याचा थोडाबहुत अनुभव आला असल्याचे अजित पवारांनी सांगताच मंचावरील उपस्थित मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला.