मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप दादरच्या चैत्यभूमीवर

मणिपूरपासून निघालेली राहुल गांधी यांची ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रा ६७०० किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईतील चैत्यभूमीवर समाप्त झाली. यावेळी राहुल गांधी यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले. याआधी सकाळी यात्रा भिवंडीतून सुरु झाली त्यानंतर कळवा, मुंब्रा, ठाणे, भांडूप, सायन, धारावीतून दादर येथील चैत्यभूमीवर आली. मुंबईत भारत जोडो यात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात आले. उद्या शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होत असून या सभेतून इंडिया आघाडी लोकसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहे.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस वेणुगोपाल, प्रियंका गांधी, मीडिया विभागाचे प्रभारी जयराम रमेश, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेत सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, आनंदराज आंबेडकर, भीमराव आंबेडकर AICC चे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल, बी.एम. संदीप, CWC सदस्य व खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार भाई जगताप, मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणजित सप्रा, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, संजय निरुपम, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, सचिन सावंत, राजन भोसले, आदी उपस्थित होते

भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी धारावीकरांना संबोधित केले, देशातील सर्व महत्वाच्या कंपन्या, संपत्ती फक्त अदानी व अंबानी यांनाच विकल्या जात आहेत. धारावी तुमची हक्काची जमीन आहे परंतु दलालाच्या माध्यमातून ही जमीनही बळकावली जात आहे. धारावीची जमीन बळाकणाऱ्या अदानीच्या मागे देशाचे पंतप्रधान ईडी, सीबीआय, आयकर विभाग घेऊन उभे आहेत. धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला देऊन पोलीस बळाचा वापर करुन स्थानिक धारावीकरांना हुसकावले जात आहे, असा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. धारावी तुमची आहे व तुमचीच राहिली पाहिजे. धारावीत सर्व प्रकारचे छोट्या छोट्या वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते, कौशल्याचे काम येथे होत आहे, या उद्योगाला पाठिंबा दिला पाहिजे, बँकांचे दरवाजे उघडे केले पाहिजेत. धारावी भारताचे उत्पादन हब बनवले पाहिजे कारण धारावीच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ आहे. देश तुमच्या सारख्यांच्या मेहनतीवर उभा राहतो, दलालांमुळे नाही परंतु आज मेहनत तुम्ही करता व पैसा अदानी घेऊन जातो. आज लढाई कौशल्य व दलाल यांच्यात आहे, आज लढाई धारावी व अदानी यांच्यात आहे. तुम्हाला लुटले जात आहे, जागे व्हा, असे आवाहन यावेळी केले.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या की, सरकार जनतेपासून वस्तुस्थिती लपवत आहे. देशाची वस्तुस्थिती कळावी व जनतेला जागृत करण्यासाठी राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रा काढली. मागील १० वर्षात महागाई, बेरोजगारी कमी झालेली नाही. मोठे इव्हेंट करून काम होत असल्याचे दाखवले जात आहे परंतु परिस्थिती तशी नाही. जीएसटी व नोटबंदीने देशातील जनतेचे प्रचंड हाल केले आहेत. अग्निवीरमध्ये भरती होण्यास तरुण तयार नाहीत. ४ वर्षांची लष्करी सेवा करुन काय करायचे अशी स्थिती या तरुणांची झालेली आहे. भाजपा सरकार गरिबांसाठी काम करत नाही ते फक्त धनदांडग्यांसाठी काम करते असा हल्लाबोलही केला.

About Editor

Check Also

डॉ. आंबेडकर बीडीडी चाळ संकुलातील ८६४ पुनर्वसन सदनिकांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १६ मार्चला वितरण पुनर्वसन सदनिकांमध्ये निवृत्त पोलिस, त्यांचे वारस व कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांच्या ४२३ सदनिकांचा समावेश

आशियातील नागरी पुनरुत्थानाच्या सर्वात मोठ्या बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव येथील प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *