भ्रष्टाचारमुक्त भारताची ‘मोदी की गॅरंटी’

भ्रष्टाचार, कमिशनखोरी, लुबाडणूक, दलाली आणि लाचखोरी याच इतिहासाने बरबरटेल्या काँग्रेसचा आणखी एक भ्रष्ट चेहरा झारखंडमध्ये उजेडात आला आहे. या राज्यात काँग्रेसचे राज्यसभा सदस्य धीरज साहू यांच्या घरात सुमारे नऊ कपाटांमध्ये खचाखच भरलेली दोनशे कोटींहून अधिक रकमेची रोकड जप्त करण्यात आली आहे. काळा पैसा आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या मोहिमेतून आता काँग्रेसचा कारभार उघडकीस येऊ लागला असून जिथे काँग्रेस तिथे भ्रष्टाचार हे समीकरण झाले आहे,तर भ्रष्टाचार निपटून काढणे ही मोदी की गॅरंटी असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा घणाघाती दावा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आ.आशीष शेलार यांनी शनिवारी केला. मुंबई भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

झारखंडमध्ये काँग्रेसच्या एका संसद सदस्याच्या घरात ही कोट्यवधींची रोकड सापडली,तर या हिशेबाने काँग्रेसच्या अन्य नेत्यांच्या घरी आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेल्या गांधी कुटुंबाकडे किती संपत्ती असेल याचा हिशेब जनतेने करावा असेही ते म्हणाले. या हिशेबानुसार,गांधी परिवार हा जगातील सर्वात भ्रष्ट परिवार ठरेल,असा आरोपही त्यांनी केला. जेथे जेथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचा आहे, तेथे तेथे भ्रष्टाचाराची गॅरंटी आहे, आणि जेथे भाजपा आहे, तेथे स्वच्छ कारभाराची गॅरंटी आहे, असेही आ. शेलार म्हणाले. काँग्रेसचे नेते व कार्यकर्त्यांना जेथे भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण मिळते, ते केंद्रस्थान आता देशाला माहीत झाले आहेच,तर त्याचे नाव गांधी करप्शन सेंटर असे ठेवावे, असा उपरोधिक सल्लाही आ. शेलार यांनी दिला.

या परिवाराकडूनच काँग्रेसींना भ्रष्टाचाराचे प्रशिक्षण दिले जाते का, असा सवालही त्यांनी केला. या सेंटरमधून प्रशिक्षण घेतलेल्यांच्या काळ्या कमाईचा नेमका किती हिस्सा गांधी परिवाराकडे जातो त्याचा हिशेब द्या, अशी मागणी करून ते म्हणाले की,देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याची गॅरंटी देणारे मोदी सरकार आता या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही.काँग्रेसच्या एका खासदाराकडे कपाटे ओसंडून वाहतील एवढा काळा पैसा असून ज्यांच्या कृपेने हे नेते बनले त्या गरीब जनतेचे डोळे या संपत्तीने दिपून गेले असतील.

भ्रष्टाचाराचे भांडे फुटू लागल्यामुळेच सारे भ्रष्ट नेते इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आले असून एकएक प्रकरण बाहेर पडू लागल्यामुळे आता ईडी, सीबीआय, आयटी या संस्थांच्या नावाने सामूहिक रडगाणे सुरू झाले आहे. झारखंडमधील सत्तारूढ पक्षाच्या एका खासदाराचा हा घोटाळा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या डोळ्यादेखत उघडकीस आल्याने आता त्यांना क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत शेलार यांनी काँग्रेसच्या सत्तेला खडे बोल सुनावले.

इंडिया आघाडीच्या नावाने एकत्र आलेल्या सर्वांचा इतिहास भ्रष्टाचाराचाच आहे. बेंगळूरूमध्ये काँग्रेसच्या एका निकटवर्तीयाच्याच घरी ४२ कोटींचे घबाड सापडले होते.पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारमधील पार्थ चॅटर्जी यांच्या घरात ५० कोटींची रोकड व कोट्यवधींचे सोने सापडले होते,तर अरविंद केजरीवाल यांचा इमानदार साथीदार सत्येंद्र जैन याच्याकडेही सोन्याची नाणी व कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आल्यावर केजरीवाल यांनी मौन धारण करून भ्रष्टाचार लपविण्याची धडपड चालविली आहे,असे ते म्हणाले.

छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेवर असताना उघडकीस आलेल्या महादेव ऑनलाईन जुगारातील हप्तेखोरी प्रकरणात खुद्द मुख्यमंत्र्यांचेच हात बरबटले होते,म्हणूनच जनतेने त्यांना घरी बसवून मोदींच्या गॅरंटीवर गाढ विश्वास व्यक्त केला,असे शेलार म्हणाले.

काँग्रेस आणि हेमंत सोरेन यांच्या ‘’ठगबंधन’’ सरकारने ‘’मनरेगा’’ मध्ये साडे पाचशे कोटी, कोळसा खाणींच्या व्यवहारात दीड हजार कोटी, अवैध खाण उत्खननातून दीड हजार कोटी, ग्रामीण विकास निधीतून दीड हजार कोटी, जमीन घोटाळ्यातून तीन हजार कोटींच्या जनतेच्या पैशावर डल्ला मारला आहे, असा आरोपही करत मोदी की गॅरंटी ही केवळ निवडणूक प्रचाराचा मुद्दा नाही. भ्रष्टाचार निपटून काढण्याच्या मोदी सरकारच्या गॅरंटीने कांग्रेसच्या भ्रष्ट कारभाराच्या मुळावर घाव घालण्यास सुरवात केली असून इंडिया आघाडीतील एकामागोमाग एक भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या काळ्या कारभाराचा हिशेब जनतेसमोर द्यावाच लागणार आहे असा विश्वासही आ.शेलार यांनी व्यक्त केला.

About Editor

Check Also

महाराष्ट्राच्या जनतेच्या विकासात समृद्धीची पहाट घडवण्याचा एकनाथ शिंदे यांचा संकल्प ठाण्यातील पारंपरिक नववर्ष स्वागत शोभायात्रेत उपमुख्यमंत्र्यांसह शहरातील प्रमुख नेत्यांचा उत्स्फूर्त सहभाग

“महाराष्ट्रातील प्रत्येक घरावर आनंदाची, प्रगतीची आणि विकासाची गुढी अभिमानाने उभारली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *