शरद पवार यांनी स्पष्टचं सांगितले, पाच-सहा लाख देऊन प्रश्न सुटणार नाहीत… समृध्दी महामार्गावरील सततच्या अपघातावरून राज्य सरकारला सल्ला

समृध्दी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ एका खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात होऊन लागलेल्या आगीत २५ जणांचा मृत्यू झाला. समृध्दी महामार्गावर सातत्याने अपघात होत असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी फक्त अपघातील मृतांच्या नातेवाईकांना चार-पाच लाख रूपये देऊन प्रश्न सुटणार नाही तर रस्ते तज्ञांना बोलावून याची पुन्हा पाहणी करावी आणि त्यातील त्रुटी दूर कराव्यात गरज असेल तेथे दुरूस्थी करावी असा सल्ला दिला.

आज पुणे येथील एका कार्यक्रमानंतर समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताबाबत शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  बोलताना शरद पवार म्हणाले, समृद्धी महामार्गावर अनेक अपघात झाले ही गोष्ट खरी आहे, परंतु दुर्दैवाने या महामार्गावर सातत्याने कुठे ना कुठे अपघात होत आहेत. हे गेले काही महिने बघायला मिळते आहे. मध्यंतरी या महामार्गावरुन जात असताना काही लोकांनी याबाबत त्यांचा अनुभव सांगितला. त्यावेळी त्या लोकांनी या महामार्गाची महाराष्ट्रात फार मोठी चर्चा झाली, फार उदोउदो झाला. पण आम्हाला सातत्याने एखाद दुसरा अपघात पहायला मिळत आहेत. त्याचे कारण कदाचित याचे सायंटिफिक नियोजन केले नसावे त्याचा दुष्परिणाम लोक मृत्युमुखी पडत आहेत, असेही सांगितले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, हा महामार्ग तयार करण्याच्या कालावधीत, निर्णय घेण्यात, त्याचे नियोजन आखण्यात ज्यांची जबाबदारी होती त्या लोकांना ते कळत – नकळत दोषी ठरवतात. काय झाले असेल ते झाले असेल पण जी दुर्घटना घडली ती दु:खद आहे असेही म्हणाले.

शरद पवार म्हणाले, अपघात झाला की राज्य सरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे प्रश्न सुटणार नाहीत. जे झाले ते वाईट झाले असून यासंदर्भात या देशामध्ये रस्ते व त्याचे नियोजन या सगळ्या संबंधीचे ज्ञान असणारे आणि जे कर्तबगार लोक आहेत त्यांची एक टीम तयार करावी…संपूर्ण रस्त्याची पुन्हा पाहणी करावी… कुठे चूक झालेली आहे… कशामुळे चूक झाली आहे…ती शोधून काढावी आणि याप्रकारे लोक जात आहेत ती स्थिती आणि याप्रकारचे वाढते अपघात आहेत ती स्थिती थांबवण्यास हातभार लावावा. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे असा सल्लाही राज्य सरकारला दिला.

त्याचबरोबर शरद पवार म्हणाले, माझं वैयक्तिक मत आहे. आपण प्रवास करताना डोक्यात काही खुणा असतात, काही वळणे दिसतात, झाडे दिसतात परंतु या प्रवासात रस्त्याची सलगता आहे आणि आजुबाजुला कुठे काही नाही. अनेक ठिकाणी या गोष्टींचा परिणाम वाहन चालवतो त्यांच्यावर होतो का अशी शंका काही लोकांनी बोलून दाखवली आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण यातील जे काही तज्ज्ञ आहेत त्यांचा सल्ला घेतला पाहिजे आणि कुठे दुरुस्ती करायची शक्यता असेल तर ती केली पाहिजे अशी मागणीही केली.

एमएसआरडीसीने त्यांच्या ज्या काही कमतरता आहेत, त्या दुसर्‍यावर ढकलायचा प्रयत्न केला आहे. माझे मते या देशातील इंडियन रोड काँग्रेसने यांची पाहणी केली असे तुम्ही म्हणत असाल आणि जर हे खरे असेल तर जगातील जे चांगले तज्ज्ञ आहेत त्यांना बोलवावे. त्यांची एक कमिटी करावी. त्यामार्फत चौकशी करावी, त्यांचे रिकमेंडेशन घ्यावे आणि करेक्शन मेजर द्यावीत असा सल्ला दिला तर त्याची अंमलबजावणी करावी कारण लोकांचे प्राण हे महत्वाचे आहेत असेही शरद पवार म्हणाले.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *