शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर सुरुवातीला उध्दव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणाऱ्या या बंडखोरांनी नंतरच्या कालावधीत मात्र उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. मात्र आज नेमके फ्रेंडशिप डे चे औचित्य साधत एकनाथ शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि शहाजी पाटील या दोन आमदारांनी उध्दव ठाकरे यांना साद घालत हात पुढे केला. मात्र यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबद्दल थेट भाष्य करण्याचे टाळत म्हणाले, फ्रेडशिप डे सर्वांसाठी असतो.
नवी दिल्लीत नीती आयोगाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय पंचायती राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राहुल शेवाळे आदी उपस्थित होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा मैत्री पाहायला मिळेल का? त्यास उत्तर देताना ते म्हणाले, फ्रेंडशिप डे हा सर्वांसाठीच असतो. माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आहेत.
यावेळी त्यांनी नीति आयोगाच्या बैठकीत कोण-कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यात सध्या शिवसेना आणि भाजपा युतीचं सरकार असून आगामी निवडणुकीत ‘मिशन ४८’ साठी युती मजबुतीने काम करेल. तसेच राज्यातील विविध विकास कामांसाठी १८ हजार कोंटींचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवल्याचंही त्यांनी यावेळी सांगितले.
तलाव सुधारण्यासाठी ६०० कोटींचा प्रस्ताव, नवी शहरं उभारणे, कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणे, राष्ट्रीय शिक्षण धोरण आदी विषयांवर नीति आयोगाच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली असून महाराष्ट्राला जीएसटीचा परतावा लवकरच मिळेल. त्याचबरोबर राज्यातील विविध शाळांमध्ये ‘आपले गुरूजी’ उपक्रम राबवण्यात येणार असून वर्गांमध्ये शिक्षकांचे फोटो लावले जाणार आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितले.