राज ठाकरे यांचा भाजपासह अजित पवारावर साधला निशाणा, आधी पक्ष बांधायला शिका… पक्ष फोडाफोडीवरून भाजपावर तर भाजपासोबत गेल्याने गाडीमध्ये झोपून जावं लागतय

काही दिवसांपूर्वी मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांची गाडी एका टोल नाक्यावर अडवल्यानंतर मनसैनिकांनी नाशिकजवळील टोलनाक्याची तोडफोड केली. त्यावर टीका करताना भाजपाच्या नेत्यांनी कधीतरी रस्ते आणि टोल नाकेही बांधायला शिका,असा खोचक सल्ला मनसेला दिला होता. या टीकेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज प्रत्युत्तर देताना टोल बांधण्याचा सल्ला देणाऱ्या भाजपाने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्यापेक्षा आपलाही पक्ष बांधायला शिकावा, आणि आपल्याच आमदार निवडूण आणायला शिकावे असं सांगत थेट भाजपाच्या वर्मावर घाव घातला.

मागील १३ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेत कोकणवासियांना बुधवारी पनवेलमध्ये एकत्र करुन निर्धार मेळावा घेत राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भाजपा आणि अजित पवार गटावर तुफान हल्लाबोल केला.

राज ठाकरे म्हणाले, राज्यभरातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. समृद्धी महामार्गाचं उद्घाटन होऊन जवळपास ७ महिने झाले तरी आणखी फेन्सिंग बसवलेलं नाही. या ७ महिन्याच्या कालावधीत ३५० लोकं मृत्यूमुखी पावल्याचे सांगत मुंबई गोवा रस्त्यावर मागच्या १० वर्षात २५०० हून अधिक लोक अपघातात मरण पावल्याचे सांगत या रस्त्यावर १५ हजार कोटीहून अधिक रक्कम खर्च झाल्याचा दावाही केली.
यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, मागच्या महिन्यात अमित नाशिकला निघाला होता. तिथे टोलनाक्यावर त्याची गाडी अडवली, काही प्रकरण घडलं, पुढे टोलनाका फुटला. त्यावर प्रतिक्रिया देताना भाजपाने “आम्हाला सांगितलं की कधीतरी रस्ते आणि टोलनाकेही बांधायला शिका…. मला त्यांना सांगायचंय की फक्त दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा कधीतरी आपलेही पक्ष बांधायला शिका…” हे त्यांना सांगायचंय असे सांगत मला अजून कळलं नाही की चांद्रयान जे चंद्रावर गेलंय, त्याचा काय उपयोग आहे आपल्याला? तिथे जाऊन खड्डेच बघायचे आहेत. ते महाराष्ट्रात सोडलं असतं तर खर्चही वाचला असता, अशी मिश्किल टिप्पणीही राज ठाकरेंनी केली, ज्यावर उपस्थित मनसैनिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्याविरोधी भूमिका घेऊन भाजपाशी संसार थाटलेल्या अजित पवार यांचाही समाचार घेताना म्हणाले, भाजपासोबत गेलेल्यांना गाडीत झोपून जावं लागलं. मी तुला दिसलो का गाडीमध्ये, मी झोपलो होतो का, मी होतो का तिथे… निर्लज्जपणाचा कळस आहे… असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका केली.

तसेच पुढे बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या स्टाईलमध्ये म्हणाले की, आपण या सरकारमध्ये का आला आहात? असं पत्रकारांनी त्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचा विकास करायचा आहे… अहो कशाला खोटं बोलता… सहा दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी तुमचा ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार काढला.. तुम्ही टुणकन इकडून तिकडे उडी मारली… कारण भुजबळांनी सांगितलं असेल ना आतमध्ये काय असतं… जाऊ नका… तिथे नको- इकडे जाऊ…” अशा खोचक शब्दात अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

राज ठाकरे यांनी भाजपावर आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हणाले, भाजपामध्ये लोकांना कनपटीवर बंदूक ठेवून पक्षात आणले जाते. मग लोकांवर गाडीत झोपून जायची वेळ येते. काही दिवसांपूर्वीच अजित पवार आणि शरद पवार यांच्यात पुण्यातील एका उद्योजकाच्या घरी गुप्त बैठक झाली होती. येथून बाहेर पडताना अजित पवार प्रसारमाध्यमांना चुकवण्यासाठी गाडीच्या सीटवर आडवे पडले होते. याच मुद्द्यावरुन राज ठाकरे यांनी अजित पवार आणि भाजपावर निशाणा साधला.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, अमेरिकेबरोबर व्यापारी करार केल्याने शेतमालाचे भाव पडले सरकारकडे पैसे नसताना ८८ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाची गरजच काय?

अमेरिकेबरोबर व्यापारी करार झाल्यापासून भारतातील सर्व शेतमालांचे भाव पडले आहेत, फळांचेही भाव पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *