अजित पवार पैठणमध्ये तुफान टोलेबाजी करत म्हणाले, मंत्री झाल्यावर भुमरेंनी ९ दारूची दुकाने… पैठण तालुक्यात काँग्रेसने, राष्ट्रवादीने साखर कारखाने, एमआयडीसी, महाविद्यालय दिल्या

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मी सकाळी सकाळी लवकर उठून कामाला सुरुवात करतो. तर काहीजण टाकायलाच सुरुवात करतात असे वक्तव्य करत नेमका नेमका कोणावर टीका केली याविषयीची चर्चा सुरु झाली. त्यानंतर आज पैठणमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी थेट मंत्री संदीपान भुमरे यांच्यावरच निशाणा साधला. तसेच संदीपान भुमरे यांनी पैठणला काय दिले असा सवाल करत पैठणच्या विकासासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीने धरण दिले, शिक्षणाच्या सुविधा दिल्या. पण भुमरेंनी मंत्री होताच पैठणला ९ दारूची दुकाने दिली. त्याचबरोबर लोकांनी दारूच्या दुकानात यावे म्हणून गतिरोधकही बांधला अशी खोचक टीका केली.

आज शनिवारी अजित पवार हे पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी पैठणमध्ये आले होते. त्यावेळी झालेल्या जाहिर सभेत अजित पवार यांनी फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर हल्लाबोल करत पोलखोल केली.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पैठण तालुक्यात साखर कारखाने, आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे. भुमरेंनी काय दिलं?, असा सवाल ही उपस्थित केला.

सभेला संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, पैठण तालुक्याला जायकवाडी धरण, दोन सहकारी साखर कारखाने, संत ज्ञानेश्वर उद्यान, पैठणचं आपेगाव विकास प्रतिष्ठान, एमआयडीसी, महाविद्यालय हे सर्व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने दिलं आहे. भुसरेंनी काय दिलं? याचा लोकांनी विचार करायला हवा. पाच वर्षे निघून जातात. एकदा शेतकऱ्यांचं पिक उद्ध्वस्त झालं, तर तीन वर्षे शेतकरी उमजत नाही. एक आमदार चुकीचा निवडला, तर पुढं तुमचं वाटोळं होतं, असा खोचक टोलाही भुमरेंना लगावला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पैठण तालुक्यात शाळा, मेडिकल कॉलेज, रुग्णालय, साखर कारखाने, रस्ते होण्याची अपेक्षा होती. पण, मंत्री आणि पालक मंत्रीपद मिळाल्यानंतर ९ दारूची दुकाने उघडली. दुकानासमोर गतिरोधक बसवलं. का तर… गाडी थांबावी आणि गिऱ्हाइकाने थांबत टाकून जावं… उलट लहान मुले-मुलींना त्रास होऊ नये म्हणून शाळा जवळ गतिरोधक बसवतो. मात्र, या पद्धतीने स्वत:ची दुकाने चालवण्यासाठी गतिरोधक बसवता. कुठे फेडाल हे पाप…तळतळाट लागेल, अशी मिश्कील टिप्पणीही केली.

तसेच हे राज्यातील घटनाबाह्य सरकार असून यांच्याकडून फक्त स्वतःची घरे भरण्याची कामे केल्याचा आरोप केला.

दरम्यान, अजित पवार यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संदीपान भुमरे म्हणाले, अजित पवार यांनी आम्हाला गद्दार म्हणून नये त्यांनी तर पहाटेच्यावेळी राजभवनात जाऊन शपथ घेतली. आमच्यावर दारूची दुकाने आणल्याचा आरोप करता तुम्ही तर ज्यांच्या घरी चहा प्यायला जाता त्यांची तर अल्कोहोलचे कारखाने असल्याचा पलटवार केला.

About Editor

Check Also

आमदार विलास तरे यांची माहिती, २ वर्षात २०० एस. टी. बसेस पालघर वासियांना मिळणार परिवहन मंत्री तथा सहपालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबतच्या बैठकीत निर्णय

पालघर जिल्ह्यातील राज्य परिवहन सेवेतील मनुष्यबळ व बसेस कमतरता दूर करण्याच्या दृष्टीने परिवहन मंत्री तथा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *