अटक करण्यात आल्यानंतर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर नैसर्गिक विधीसाठी शौचालय वापरू दिले नाही तसेच पिण्यासाठी पाणी दिले नसल्याचा आरोप करत आपणास जातीवाचक शिविगाळ केल्याचा गंभीर आरोप राणा यांनी केला. तसेच यासंदर्भात लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तक्रारही केली. मात्र मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी या अटकेनंतरचा खार पोलिस ठाण्यातील राणा दांम्पत्याचा व्हिडिओ शेअर करत राणांच्या आरोपातील हवाच काढून घेतली. मुंबई पोलिस आयुक्तांपाठोपाठ आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळेस-पाटील यांनीही खासदार राणा यांच्या तक्रारीमध्ये वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट करत त्याची माहिती लोकसभाध्यक्षांना राज्य सरकार देणार असल्याचे सांगितले.
खासदार राणा यांनी लोकसभाध्यक्षा ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नवनीत राणा यांच्या आरोपात तथ्य असल्याचे सांगत मुंबई पोलिसांच्या कार्य पध्दतीवर आरोप केले.
खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या तक्रारीसंदर्भात चौकशी केली असून त्यामध्ये वस्तुस्थिती नाही तरीसुद्धा लोकसभा अध्यक्षांनी माहिती मागवली आहे तर ती माहिती राज्य सरकार देईल अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.
राष्ट्रवादी जनता दरबारासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील प्रदेश कार्यालयात आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपावर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलिस कायद्यानेच काम करत असून कायद्याच्या बाहेर कोणतेही काम करत नाहीत. मुंबई पोलिस उत्तम काम करत असून कायद्याप्रमाणे त्यांना जे योग्य वाटते, त्यावर ते कार्यवाही करत आहे अशा शब्दात मुंबई पोलिसांच्या कारवाईचे समर्थन केले.
औरंगाबाद येथे मनसेकडून सभा घेण्यात येत आहे. या सभेबाबत औरंगाबादचे पोलिस आयुक्त एक दोन दिवसात बैठक घेऊन त्यावर निर्णय देतील, यासाठी पोलिस महासंचालकांशीही ते चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
काल सर्वपक्षीय बैठक घेतल्यानंतरही जर कुणाला वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यावर औरंगाबादचे पोलिस आयुक्त निर्णय घेतील. हा त्यांचा अधिकार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Marathi e-Batmya