उध्दव ठाकरे म्हणाले, थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या विजयानंतर ऋतुजा लटके मातोश्रीवर ठाकरेंच्या भेटीला

शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गट-भाजपा आणि उध्दव ठाकरे गटातील पहिली लिटमस टेस्ट अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पार पडली. या निवडणूकीत ६५ हजार मतांनी विजय मिळविल्यानंतर उध्दव ठाकरे गटाच्या विजयी उमेदवार ऋतुजा लटके या मातोश्रीवर जात उध्दव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्ये उपस्थित होते. यावेळी उध्दव ठाकरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, मशाल भडकली आणि भगवा फडकला.

उध्दव ठाकरे म्हणाले, कपट कारस्थानानंतर पहिली पोटनिवडणूक झाली. आमचं चिन्ह आणि नाव गोठवलं गेलं. मशाल चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढलो. ही मशाल भडकली असून भगवा फडकला आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. या विजयाचं श्रेय शिवसैनिकांसह आमच्यासोबत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड आणि हितचिंतकांचं आहे. त्या सर्वांचे मी आभार मानतो.

लढाईची सुरुवातच विजयाने झाली असून भविष्यातील लढाईची आता मला चिंता नाही. या निवडणुकीत ज्याप्रमाणे एकजुटीने हा विजय खेचून आणला, त्याचप्रमाणे यापुढेही विजय एकत्र मिळून खेचून आणू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नोटाला दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक मतं मिळाल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं होतं. ज्यांच्या मागणीवरुन गोठवलं ते या निवडणुकीच्या रिंगणात आजुबाजूलाही नव्हते. मात्र त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी प्रथम अर्ज भरला. पण अंदाज आल्यानंतर माघार घेतली. जर त्यांनी त्यांच्या चिन्हावर निवडणूक निवडणूक लढवली असती तर ही मतं त्यांना मिळाली असती. नोटाच्या मागे काय गुपित आहे हे सर्वांनाच माहिती आहे, असा उपरोधिक टोलाही त्यांनी शिंदे गट आणि भाजपाला त्यांचे नाव न घेतला लगावला.

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला असल्याच्या फडणवीसांच्या विधानावर ते म्हणाले, लोकांसमोर सर्व घडलं आहे. आता कोण काय बोलतंय यापेक्षा तुम्ही काय करत आहात हे लोक पाहत आहेत. हा दृष्टीहीन धृतराष्ट्र नसून उघड्या डोळ्यांनी पाहणारा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. त्याच्यामुळे धृतराष्ट्र आणि महाराष्ट्रात फरक आहे. कोणी काही बोललं तरी जनता उघड्या डोळ्याने पाहत आहे असेही ते म्हणाले.

आशिष शेलार यांच्याबाबत विचारले असता ते म्हणाले, असे खूप लोक बोलतात म्हणत जास्त भाष्य करण्याचे टाळलं. शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. सर्वजण एका वेगळ्या लढाईच्या तयारीत होते. विरोधकांनी माघार घेतल्यानंतर उत्साहावर थोडं पाणी पडलं पण तरीही मशाली भडकल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गुजरातमधील निवडणुकीसाठी काही इच्छुक आले आहेत. पण आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं. तसंच राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *