बँकेच्या निकालानंतर नारायण राणे म्हणाले, अक्कल ज्यांना आहे त्याच्याकडे बँक आली अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर टीकास्त्र

मराठी ई-बातम्या टीम
सिंधुदूर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीच्या निमित्ताने दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील आणि उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः लक्ष घालत मतदारांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडूण देण्याचे आवाहन केले. परंतु सिंधुदूर्ग वासियांनी भाजपाच्या पारड्यात मताचे दान टाकले या निकालानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर बोलताना म्हणाले की, विजय मिळवताना अकलेचा वापर झाला, अक्कल ज्यांना आहे, त्यांच्या ताब्यात आमच्या देवदेवतांनी जिल्हा बँक दिली आहे.
जिल्हा बँकेतील या मोठ्या विजयानंतर आता पुढील नियोजन काय असेल, असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच नारायण राणे यांनी राज्यातील सरकारकडे रोख करत, आता यानंतरचं लक्ष्य महाराष्ट्रातील सत्तेचं असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भाजपाची सत्ता आली आहे. माझी नाही. या जिल्ह्यातल्या देवदेवता आणि जनता यांच्या आशीर्वादामुळे ही सत्ता आली आहे. माझे सर्व कार्यकर्ते आणि त्यांच्या सोबत नितेश राणेनं घेतलेली मेहनत, त्याला निलेश राणे आणि जिल्हाध्यक्ष राजन तेली या सगळ्यांनी दिलेली साथ यामुळे हा विजय मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
आघाडीला इशारा देत म्हणाले की, आता लक्ष्य महाराष्ट्र सरकार. तिन्ही जिल्ह्यात ज्या काही विधानसभा होतील, त्यासोबत लोकसभेचा खासदार हा भारतीय जनता पक्षाचाच असेल. नको असलेले, ज्यांचे चेहरे पाहवत नाहीत, अशा लोकांना आमचा जिल्हा लोकप्रतिनिधीपदी ठेवणार नाही असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.
आता महाराष्ट्राकडे लक्ष्य म्हणजे तिथे थोडक्यात आमची सत्ता हुकली आहे. राज्याला मुख्यमंत्री आणि चांगल्या सरकारची गरज आहे. हे राज्य किमान १० वर्ष तरी अधोगतीकडे चाललंय. आम्हाला भाजपाचा मुख्यमंत्री हवाय, लगानची टीम नकोय असा खोचक टोलाही त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.
सगळ्यांना पुरून एवढे वर्ष उरलोय आणि आता केंद्रापर्यंत पोहोचलोय. मध्ये थांबलो नाहीये मी. त्यामुळे अशा चौकशांचा मला फरक पडत नाही. अमित शाह यांना इथे घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. इथे पोलीस यंत्रणा कशा काम करतात, कोर्ट कचेऱ्या कशा होतात, हे सगळं त्यांना भेटून सांगणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांचे निकाल आज हाती आले असून त्यामध्ये नारायण राणे यांच्या सिंद्धिविनायक पॅनलचे ११ संचालक निवडून आले आहेत. भाजपाचे ११ संचालक आणि विरोधी पॅनलचे ८ संचालक निवडून आल्यानंतर भाजपाने या निवडणुकीत मोठा विजय मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपाचे राजन तेली यांचा पराभव झाला आहे. तर सतीश सावंत यांचाही एका मताने पराभव झाला आहे.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *