मागील काही दिवसांपासून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर जाहिर केलेल्या लाडकी बहिण योजनेच्या योजनेतून अनेक महिलांना बाहेर काढण्यात आल्याचे वृत्त पुढे येत होते. तसेच अनेक महिलांना या योजनेतून कमी करणार असल्याची चर्चाही वेळोवेळी रंगत होती. इतकेच नव्हे तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा वाढीव हप्ताही देणार असल्याचे चर्चा यावेळी सुरु झाली होती. पंरतु वाढीव हप्ताही काही अद्याप महायुती सरकारने अद्याप जाहिर केला नाही. या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजनेवरून उलट सुलट चर्चेला एकच उत आला होता. यापार्श्वभूमीवर आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनीच कोणत्या आणि कोणा लाडक्या बहिणीला योजनेचा लाभ मिळणार याबाबतची स्पष्टोक्ती दिली आहे.
नांदेड येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, लोक तुम्हाला विचारतील २१०० रूपये देणार होते त्याचं काय झालं, त्यांना म्हणावं महायुतीने शब्द दिलाय पाच वर्षांच सरकार आहे. मूलभूत प्रश्न सोडविल्यावर परिस्थितीनुरूप निर्णय घेण्यात येणार आहे. काहीजण म्हणत होते की, लाडकी बहिण योजना बंद होईल पण महिलांनो लाडकी बहिण योजना ही गरिब महिलांकरिता असल्याचे सांगितले.
गरजू महिलांची व्याख्या करताना अजित पवार म्हणाले की, ज्या महिलाचं उत्पन्न २ लाख ५० हजाराच्या आत आहे. खुरपण करणारी, धुणंभाडी करणारी, झाडू पोछा करणारी, झोपडपट्टीत कष्टाचं जीवन जगणारी, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तसेच ज्यांन त्यांची मुलं, मुली, सुना-जावई सांभाळत नाही अशांसाठी ही योजना आहे. त्यांचीही संख्या मोठी असल्याचे यावेळी सांगितले.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, आणि त्यांना या योजनेचे पैसे दिले गेले आहेत. ते पैसे परत घेणार नाही, रक्षाबंधन आणि भाऊबीजेची ओवाळणी दिली. होळीच्या निमित्ताने ३ हजार रूपये दिले ते पैसे परत घेणार नसल्याचे सांगत या योजनेसाठी आदिती तटकरे या पाठपुरावा करत आहेत. इतरही योजनांना न्याय देण्याचं काम महायुती सरकारचं असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya