संसदेचे सध्या अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशाच्या सुरुवातीला राष्ट्रपतीचे भाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही वक्तव्य केली. त्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्यातील विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात उमटले. त्यावरून भाजपाचे आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. त्यामुळे अंबादास दानवे यांना पाच दिवस निलंबित करण्यात आले. मात्र आता अंबादास दानवे यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी पाच दिवसांवरून तीन दिवसांवर आणण्यात आल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली.
राहुल गांधी यांच्या भाषणाचे पडसाद राज्याच्या विधान परिषदेत उमटल्यानंतर भाजपाकडून राहुल गांधी यांच्या विरोधातील निषेधाचा ठराव मांडण्याची मागणी भाजपा आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी मागणी केली. तसेच ही मागणी करताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे बोट करून प्रसाद लाड यांनी केल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला. त्यावरून प्रसाद लाड आणि अंबादास दानवे यांच्यात शाब्दीक वादावादी झाली. त्यावरून भाजपाच्या सदस्यांकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. त्यानंतर उपसभापती अॅड नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार अंबादास दानवे यांना याच अधिवेशात पाच दिवसासाठी निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे विधिमंडळाच्या इतिहासात चक्क विरोधी पक्षनेत्यालाच निलंबित कऱण्याची ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, अंबादास दानवे यांनी मला संधी न देताच आणि माझे म्हणणे ऐकून न घेता सभागृहाने माझ्यावर निलंबनाची कारवाई केली. झालेल्या प्रकाराबाबत मी सभागृहात दिलगीरी व्यक्त करणार होता. मात्र तत्पूर्वीच निलंबनाची कारवाई करण्यात आली. यासदंर्भात पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय होणार असे जाहिर सांगितले.
दरम्यान आज सकाळी अंबादास दानवे यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे झालेल्या प्रकाराबद्दल दिलगीरी व्यक्त करणारे पत्र लिहिले. त्यामुळे अखेर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी आज सकाळी विधान परिषदेचे कामकाज सुरु झाल्यानंतर म्हणाल्या की, अंबादास दानवे यांनी सभागृहाची दिलगीरी व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई पाच दिवसांवरून तीन दिवस इतकी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले.