विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत विजयी झाल्याने रिक्त झालेल्या जागांसाठी निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला. या पाच जागांसाठी भाजपाचे तीन आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्शाला प्रत्येकी एक उमेदवार असे मिळून पाच जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी २७ मार्चला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून तीन उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडून अद्याप उमेदवारांची नावे जाहिर करण्यात आलेली नाहीत.
विधान परिषदेच्या पाच जागांपैकी तीन जागांकरिता भाजपाने सचिन दिवाकरराव जोशी, संजय किशनराव केनेकर आणि विधानसभा निवडणूकीत पराभूत आमदार दादाराव केचे यांच्या नावाची घोषणा केली आहे. याशिवाय अजित पवार यांच्या महाराष्ट्रावादी काँग्रेसच्या हिश्शाला एक जागा तर शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या हिश्याला एक जागा येते. अजित पवार गटाकडील एका जागेसाठी अजित पवार यांच्याकडे ७५ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. त्यामुळे त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कोणाला उमेदवारी जाहिर करणार याबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उद्या सोमवार हा आहे. तर मतदान अर्थसंकल्पिय अधिवेशन संपल्यावर २७ मार्च रोजी या पाच जागांसाठी निवड होणार आहे.
हे ही वाचाः विधान परिषदेच्या ५ रिक्त जागांसाठी २७ मार्च रोजी निवडणूक
विधान परिषदेचे सदस्य राहिलेल्या शिवसेना शिंदे पक्षाचे आमश्या पाडवी, तर अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश विटेकर आणि भाजपाचे प्रविण दटके, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे पाच सदस्य विधानसभा निवडणूकीत वि़जयी झाले. त्यामुळे या पाचही जणांना विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे पाच जण विधानसभेवर निवडणूक गेल्याने विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून आता उमेदवारी कोणाला मिळणार अशी चर्चा राजकिय वर्तुळात निर्माण झाली आहे. या पाचही उमेदवारांना विधान परिषदेवर निवडूण आल्यानंतर सहा वर्षाऐवजी किमान अडीच, दिड आणि साडेतीन वर्षाचा कालावधी मिळणार आहे.
Marathi e-Batmya