काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीकेसीच्या मैदानात आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीनगरचे नांमातर करण्याची गरज काय मी म्हणतोय ना असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? उद्धव ठाकरेंचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची काळी रेघ असते. ‘मी म्हणतो म्हणून संभाजीनगरला संभाजीनगर समजा, मी म्हणतो म्हणून बेफिकीर समजा, दगडाला सोन्याची नाणी समजा, नळातून येणाऱ्या हवेला पाणी समजा, अशा खोचक शब्दात टीका केली.
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून पाणी प्रश्नांवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. जल आक्रोश मोर्चा हा सत्ता परिवर्तनासाठी नसून व्यवस्था परिवर्तनासाठी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पाण्यासाठी तहानलेल्या औरंगाबादची समस्या जोपर्यंत संपत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला झोपू देणार नाही, हा संघर्ष सुरूच राहिल. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचाराचा अड्डा झाल्याचा आरोप करत ते पुढे म्हणाले की, औरंगाबादचा माणूस त्रासलेला असताना भारतीय जनता पार्टी शांत बसू शकत नाही. आम्ही संघर्ष छेडला आहे. हा संघर्ष तेव्हाच संपेल जेव्हा औरंगाबादचा पाण्याचा प्रश्न संपेल अशा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत. जनतेसाठी काम करत आहोत. तुम्ही औरंगाबादमधील केवळ पोस्टर फाडू शकता, पण जनतेचा हा आक्रोश फाडू शकत नाही. कारण हा जनतेचा आक्रोश आहे. औरंगाबादमध्ये सात-सात दिवस नळातून केवळ हवा येते. येथील महिला मनातल्या मनात महाविकास आघाडी सरकारला शिव्या-शाप देतात, त्या शिव्या-शाप तुम्हा बुडवल्याशिवाय राहू शकत नाहीत असेही ते म्हणाले.
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाचा खून केल्याचा आरोप करत ते म्हणाले की, हा प्रकल्प बंद पाडल्यानेच औरंगाबादचा पाणी प्रश्न निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Marathi e-Batmya