मुंबईः प्रतिनिधी
भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही भेदभाव करणार नाही. शेतकरी, गरीब, मध्यमवर्गीय अशा सर्वांसाठी सरकार काम करेल. सामान्य आणि गोरगरिबांच्या हक्कांसाठी लढणारे हे सरकार असल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले.
केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचे आपण आभारी आहोत. मोदीजींच्या सूचनेनुसार भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता पारदर्शीपणे जनतेची सेवा करेल, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
केंद्रीय राज्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर मा. रावसाहेब पाटील दानवे यांचे मंगळवारी प्रथमच भाजपा प्रदेश कार्यालयात आगमन झाले. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले व त्यांचा सत्कार केला. नवनिर्वाचित खासदार गोपाळ शेट्टी यांचा यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती, मुख्यालय प्रभारी प्रतापभाई आशर, माध्यमविभागप्रमुख व प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष ॲड. माधवी नाईक, खा. संजयकाका पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
Marathi e-Batmya