पाच राज्यातील झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची चिंतन बैठक पार पडली. या बैठकीत नेतृत्वाच्या मुद्यावर मोठा खल झालेला असला तरी पक्षाच्या धोरणात्मक बाजूवरही चर्चा झाली. त्याच चर्चेतील मुद्यांचा धागा पकडत दिर्घ काळानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडताना म्हणाल्या की, राजकारणासाठी सोशल मीडियाचा सोयीस्कर वापर केला जात असून हे लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचं सांगत ट्वीटर आणि फेसबुकचा उल्लेख केला. तसेच या परदेशी कंपन्यांच्या माध्यमातून सर्व राजकिय पक्ष, नेते प्रॉक्सी कथानक निर्माण करत आहेत.
मला अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. आपली लोकशाही हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा दुरुपयोग वाढत आहे. फेसबुक, ट्वीटरसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून आपले नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सींकडून राजकीय कथानकांची मांडणी करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
या सोशल मीडिया कंपन्या सर्व पक्षांना योग्य संधी देत नसल्याचे वारंवार समोर आल्याचे सांगत सत्ताधारी प्रस्थापितांच्या संगनमताने ज्या प्रकारे सामाजिक सलोखा बिघडवला जात आहे ते आपल्या लोकशाहीसाठी घातक असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणाही साधला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत काँग्रेस सदस्यांनी सोनिया गांधींना अध्यक्षपदी कायम राहण्याचं आवाहन केले. सोनिया गांधींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला असता काँग्रेस सदस्यांनी नाकारला.
सोनिया गांधी यांनी या भाषणाच्या माध्यमातून भाजपासह त्यांच्या नेत्यांकडून जी प्रॉक्सी राजकिय कथानक निर्माण केली जात आहेत. त्यावरच बोलत भाजपाच्या मुळावर घाव घातला. परंतु नेमक्या याच प्रॉक्सी कथानकांचा सामना करण्याची यंत्रणा काँग्रेसकडे नसल्याने काँग्रेसला राजकिय अपयशाला सातत्याने सामोरे जावे लागत असून त्यातून आता तरी उभारी मिळालेली नाही.