नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील सत्ता स्थापनेचा अखेर घोळ संपुष्टात आला असून काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबधीची माहिती काँग्रेसकडून शिवसेनेला कळविण्यात आल्याचे १० जनपथवरील सुत्रांनी दिली.
महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा या प्रमुख मुद्यावरून भाजपाबरोबर सवता सुभा मांडला होता. शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळवायचा असेल तर भाजपाप्रणित रालोआतून आणि सरकारमधून बाहेर पडावे अशी प्रमुख अट घालण्यात आली होती. त्यानुसार शिवसेनेने केंद्र सरकारमधील त्यांच्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लावून रालोआबरोबरील सर्व संबध आज तोडले. त्यामुळे अखेर काँग्रेसने त्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
तत्पूर्वी काँग्रेसचे नेते अहमद पटेल हे सातत्याने शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करत होते. त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशीही चर्चा करत होते. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात येत होते. सरतेशेवटी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांबरोबरच आमदारांशी चर्चा करून सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya