उध्दव ठाकरे म्हणाले, यांची बावन असतील नाहीतर एकशेबावण पण शिवसेनेला… हर घर तिरंगा म्हणे पण घर नाही त्याने काय करायचे

शिवसेना कोणाची? आणि अपात्रतेच्या मुद्यावरून सध्या निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात सध्या न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मागील काही दिवसांपासून उध्दव ठाकरे यांनी जाहिरपणे बोलण्याचे टाळले होते. यापार्श्वभूमीवर मार्मिकच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात काय बोलणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकेचे फटकारे ओढत भाजपावरही शरसंधान साधले.

यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, राज्यात काही ठिकाणी अतीवृष्टी झाली आहे. पण महाराष्ट्रातलं सरकार आहे कुठे? काहीही न करता स्वत:चे सत्कार करून घेतले जात आहेत. पण अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदील झाला आहे. तिकडे जायला मंत्री कुठे आहेत? मंत्र्यांचं खातेवाटपच झालेलं नाही. सगळे मंत्री आज आझाद आहेत. आझादी का अमृत महोत्सव. पदं मिळाली आहेत, पण जबाबदारी नाहीये. करा मजा अशी टीका केली.

जे. पी. नड्डांच्या एका विधानाचा उल्लेख करत उध्दव ठाकरे म्हणाले, ८-१० दिवसांपूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलेलं वक्तव्य लोकशाहीला घातक आहे की नाही, हा विचार करायला हवा. ते म्हणाले की या देशात एकच पक्ष राहणार आहे, बाकीचे पक्ष संपत चालले आहेत. विशेषत: शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. बघू असं म्हणत, त्यांचे वक्तव्य हे देशातील १३० कोटी जनतेचे आहे का? की त्यांच्या संपूर्ण पक्षाचे आहे याचा हे एकदा तपासून पहावे लागले.

नड्डांनी जे प्रदेशाध्यक्ष नेमले आहेत, त्यांच्या नावात किती कुळे आहेत हे मला माहिती नाही. पण त्यांची कितीही कुळं उतरली, तरी शिवसेना संपवणं शक्य नाही. मग ती बावन असतील किंवा एकशे बावन असतील. त्याने मला फरक पडत नाही अशी टीकाही त्यांनी जे.पी.नड्डा यांच्याबरोबरच भाजपाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खोचक टीका केली.

देशाची मांडणी संघराज्य पद्धतीची आहे. त्यात अनेक राज्य एकत्र आले आहेत. मग नड्डांना नेमकं काय म्हणायचंय? प्रादेशिक पक्ष संपवायचेत म्हणजे तुम्हाला संघराज्य पद्धत संपवायची आहे का? संघराज्य तुम्हाला नको आहेत का? तुम्ही गादीवर बसलात म्हणून ‘हम करे सो कायदा’ ही काही लोकशाही नाही. अमृतमहोत्सवी वर्षात लोकशाही मृतावस्थेत न्यायची असेल, तर तो अमृत महोत्सव कसला? असा खोचक सवाल ही त्यांनी यावेळी केला.

७५व्या वर्धापनदिनी आपण नेमके कुठे आहोत, याचा आढावा सगळ्यांनी घेणं गरजेचं आहे. सरकारने कार्यक्रम दिलाय हरघर तिरंगा… पण ज्यांच्याकडे घरच नाही, ते तिरंगा लावणार कुठे? असा टोलाही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता लगावला.
तसेच शिवसेना ही काही इतकी सहज गोष्ट नाही की जी इकडून उचलली आणि तिकडे नेऊन ठेवली असा खोचक टोलाही त्यांनी बंडखोर एकनाथ शिंदे गटाला लगावला.

About Editor

Check Also

मुंबईत पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या ४५ हजार घरांच्या हाऊसिंग टाऊनशिपला मंजूरी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबई पोलीसांसाठी शासकीय निवासस्थाने गृहनिर्माण प्रकल्पाला मंजूरी

मुंबई शहर व उपनगरातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी सुमारे ४० ते ४५ हजार शासकीय निवासस्थाने उपलब्ध …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *