देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, विदर्भाला पूर्णपणे दुष्काळमुक्त करणार ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार

वैनगंगा – नळगंगा सारखे नदीजोड प्रकल्प राबवत महायुती सरकार विदर्भाला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार आहे,असा ठाम निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी धामणगाव येथील प्रचार सभेत व्यक्त केला.

धामणगाव रेल्वे मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात आलेल्या या सभेला माजी खासदार नवनीत राणा, सुरेशभाऊ वाघमारे, गुजरातचे आमदार बाळकृष्ण पटेल, रविराज भाऊ देशमुख, ओमजी सोनी, हरिश्चंद्र खंडाळकर, दिनेश ठाकरे, सुरेखा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की,विदर्भातील दुष्काळग्रस्त परिस्थिती बदलण्यासाठी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा देशातील सर्वात मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प ठरेल. यामुळे या भागातील स्थिती पूर्णपणे बदलून जात नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम, आणि बुलढाणा जिल्ह्यातील दहा लाख एकर जमीन सिंचनाखाली येईल. ८८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प महायुती सरकार वेगाने पूर्ण करणार आहे. या प्रकल्पाची घोषणा केल्यावर अनेकांनी त्यावर अविश्वास व्यक्त केला.पण मी प्रकल्प मंजूर केला आणि त्याच्या निविदाही काढल्या.

आमचे महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. महायुती सरकारच्या एका रुपयात पीक विमा योजनेत ८ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना भरपाई मिळाली. पुढच्या पाच वर्षांत शेतकऱ्यांना विजेचे बिल माफ करण्यात येईल. मागेल त्याला सौर कृषी पंप मिळेल. पुन्हा एकदा सरकार आल्यावर पूर्णपणे कर्जमाफी दिली जाईल. हे सरकार सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे सरकार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आ.प्रताप अडसड यांनी आपल्या वक्तृत्वाने विधानसभेत त्यांच्या मतदारसंघातील अनेक प्रश्न मांडून जनतेला न्याय मिळवून दिला. केवळ अडीच वर्षात त्यांनी २३०० कोटी रुपयांचा निधी आपल्या मतदारसंघात आणत अनेक प्रकल्प राबवण्याचे काम केले. त्यातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले. सतरा तीर्थक्षेत्रांना पाच – पाच कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून आले.पाथरगाव सिंचन योजनेसाठी ५५ कोटी रुपये दिले आणि ती योजना पूर्णत्वास नेली. विदर्भातील एकाच मतदारसंघातील तीर्थक्षेत्रांना इतका निधी मिळण्याचे हे एकमेव उदाहरण असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना मूर्ख बनवले. पण आम्ही ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो. सगळे नियम बाजूला ठेवून धामक च्या पुनर्वसनाचे काम पार पाडले. जी आश्वासने दिली ती शंभर टक्के पूर्ण करणार अशी हमी त्यांनी यावेळी दिली.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची मागणी, चाकणकर यांचा राजीनामा झाला, पण मोठ्या माशांवर कारवाई झाली पाहिजे भोंदूबाबा खरात याचे प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू, पोलिसांवर तपास करताना दबाव

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या अत्यंत संतापजनक आणि अशोभनीय घटनांवरून हे स्पष्ट होत आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *