एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे जिल्हा अग्रेसर…. पायाभूत सुविधा, रस्ते विकास, शेती प्रगती, सामाजिक अन् आरोग्य क्षेत्रात सुधारणा

आज आपण जेव्हा महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करतो, त्यावेळी मुंबई महानगर आणि विशेषतः ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करावाच लागतो. एक सर्वसामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री या प्रवासात ठाणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची जबाबदारी मी पार पाडली याचे समाधान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अडीच वर्षात ठाणे जिल्ह्याला चांगले प्रकल्प मिळाले. त्यांच्या हस्ते अनेक चांगल्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमीपूजन होऊ शकले. पायाभूत सुविधा, रस्त्यांचा विकास, शेतीची प्रगती, सामाजिक आणि आरोग्याच्या सुधारणा अशा सर्व क्षेत्रांमध्ये ठाणे जिल्हा अग्रेसर राहिला याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथील भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्याप्रसंगी उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, कल्याण स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी माधवी सरदेशमुख, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉ.डी. स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अन्य महान समाजसुधारकांना अभिवादन करून म्हणाले की, आपला देश विकासाच्या वाटेवर घोडदौड करताना दिसतो.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र हे तर भारताचे ग्रोथ इंजिन आहे. देशाला महासत्ता करण्याचे जे स्वप्न आहे ते साकार करण्यासाठी महाराष्ट्राला मोठे योगदान द्यायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्र सर्वार्थाने सज्ज आहे. ठाणेकरांना प्रतिक्षा असलेल्या इंटर्नल ठाणे मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. ठाणे बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली.

ठाणे पालिकेची नवीन आयकॉनिक इमारत उभी राहणार आहे. माझी वसुंधरा ४.० अभियानात ठाणे महानगरपालिकेने तिसरा क्रमांक पटकावून पर्यावरण संवर्धनातही आपण मागे नाही, हे दाखवून दिले आहे. ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाला मोठी गती दिली आहे. ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ झाला आहे.

ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि करीत राहू, मात्र यासाठी आपण सर्व एकजुटीने काम कराल, अशी आशा व्यक्त करून शिंदे यांनी महाराष्ट्र शांतताप्रिय राज्य आहे. इथे न्यायाचे राज्य आहे. या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ.तरुलता धानके यांनी केले.

अधिकारी, व्यक्ती/संस्थांचा गौरव

या सोहळ्याच्या निमित्ताने वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बजावलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षभरात शासनाच्या विविध योजनांसंबंधीच्या विविध उपक्रम/कार्यक्रमांना व्यापक प्रसिद्धी देऊन शासनाची आणि ठाणे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा उंचाविण्यास उल्लेखनीय यश मिळाले. या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची स्पष्टोक्ती, देशात दोन विचारधारांची लढाई, काँग्रेसची विचारधारा संविधानवादी तर भाजपाची मनुवादी काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील भारत वेगळा

देशात दोन विचारधारांची लढाई आहे, एक विचारधारा काँग्रेसची आहे तर दुसरी भाजपाची. काँग्रेस व भाजपाच्या स्वप्नातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *