नवी दिल्लीः प्रतिनिधी
राज्यात एकाबाजूला सत्ता स्थापन करण्याकरीता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शिकाँराचे सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. तर दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेल्याने राजकिय वर्तुळात विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
मात्र या भेटीनंतर पवार यांनीच राज्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण भेटल्याचे त्यांनी स्पष्ट केल्याने राजकिय वर्तुळात उठलेल्या वावड्यांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.
राज्यातील अवकाळी पावसामुळे उभी पीके गेली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांना तातडीची मदत मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्य सरकारने केंद्राला अहवाल पाठविला असूनही केंद्राकडून अद्याप म्हणावी अशी मदत मिळाली नसल्याने आपण पंतप्रधानांची भेट घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणीही त्यांनी केल्याचे सांगण्यात येत आहे.



Marathi e-Batmya