मागील काही वर्षापासून राज्यातील शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामासह इतरही अनेक अशैक्षणिक कामांच्या जबाबदाऱ्या राज्य सरकारकडून सोपविण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक शिक्षकांकडून आणि त्यांच्या संघटनांकडून अशैक्षणिक कामे करत राहीलो तर शैक्षणिक कामे कधी करणार असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर आज शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय कर्तव्याची आणि जबाबदारीची कामे वगळता इतर अशैक्षणिक कामांचा भार शिक्षकांवर पडणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शिक्षकांना दिली.
५ सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्याकडे काही शिक्षकांनी त्यांच्यावर सोपविण्यात येत असलेल्या अशैक्षणिक कामाबाबत तक्रारी केल्या. त्याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी वरील ग्वाही दिली.
शिक्षकांवर पडणाऱ्या अतिरिक्त कामांच्या तक्रारी संदर्भात सातत्याने तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. तसेच त्यासंदर्भातील काही सूचनाही माझ्याकडे यापूर्वीच आलेल्या आहेत. त्यामुळे त्यानुसार योग्य ती कारवाई कऱण्याचे निर्देश विभागाला देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
शाळाबाह्य मुलांचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या विषयावर गांभीर्यपूर्वक तोडगा काढण्याची गरज आहे. याशिवाय मध्यान्ह भोजन, व्यक्तीमत्व आणि वैयक्तीक लाभाच्या ज्या काही योजना असतील त्यातील ज्या काही त्रुटी असतील त्यातील ज्या काही समस्या असतील त्याही सुलभतेने सोडवून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकडे विशेष लक्ष राहणार असून आणण्याच्यादृष्टीने आणि त्याशी निगडीत ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.
शैक्षणिक क्षेत्रात मैलाचे दगड ठरतील असे काही विषय, उपक्रम आमच्या अजेंड्यावर आहेत. त्यावर काम सुरु असून त्यावर योग्य निर्णय घेवून शिक्षणाचे बळकटीकरण करण्याच्यादृष्टीने आपल्या शासनाचा प्रयत्न राहणार आहे. भविष्यातील परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून आणि तरूणांच्या मागणीनुसार ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्यादृष्टीने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.