नाना पटोले म्हणाले, राष्ट्रवादीकडून काँग्रेसच्या पाठीत सुरा खुपसला राष्ट्रवादीने भाजपाला पाठिंबा दिल्याने राजकिय आरोपांना सुरुवात

नुकत्याच झालेल्या भंडारा आणि गोंदियाच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणूकीत आघाडीच्या धर्माला तिलांजली देत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला पाठिंबा दिल्याने सर्वाधिक संख्याबळ असूनही काँग्रेसला विरोधात बसावे लागले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत राष्ट्रवादीने काँग्रेसच्या पाठित सुरा खुपसल्याचा आरोप ट्विट करत केला.
विशेष म्हणजे १४ महापालिकांच्या निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर हा प्रकार घडल्याने महाविकास आघआडीत सारेच आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. तसेच आघाडीचा धर्माला आघाडीतच विचारत नसल्याचे स्पष्ट झाले.
भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी धर्माला तिलांजली देण्यात आली. पटोले यांचा गृह जिल्हा असलेल्या भंडाऱ्यात काँग्रेसने भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे यांच्या गटाशी युती करून सत्तेचे समीकरण जुळवले. तर गोंदियात राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली, गोंदिया जिल्हा परिषदेत काँग्रेसचे सर्वाधिक सदस्य असूनही काँग्रेसला विरोधी बाकांवर बसावे लागले. गोंदियातील राष्ट्रवादीची खेळी नाना पटोले यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे संतापलेल्या नाना पटोले यांनी आज ट्वीट करत राष्ट्रवादीवर विश्वासघाताचा आरोप केला. या संदर्भात त्यांनी आज ट्वीट केले आहे. मैत्रीचा हात पुढे करून राष्ट्रवादी काँग्रेस ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पाठीत सुरा खुपसण्याचे काम करीत आहे. आमच्या विरोधात त्यांच्या कुरघोड्या सातत्याने सुरू आहेत. याचा जाब आम्ही त्यांना नक्कीच विचारू असेही त्यांनी आपल्या ट्विटद्वारे म्हटले.
नाना पटोले यांचा आरोप चुकीचा : जयंत पाटील
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पटोले यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. नाना पटोले यांचा आरोप चुकीचा आहे. महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण करण्याचा राष्ट्रवादीचा कधीच प्रयत्न नव्हता किंवा एकला चलो ही आमची भूमिका राहिलेली नाही. तिन्ही पक्ष एकत्र रहावेत हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे प्रफुल पटेल हे परदेशी असल्याने त्यांच्याशी संपर्क झाला नाही. गोंदियात कोणत्या परिस्थितीत निर्णय झाला याची माहिती घेण्यात येईल, जयंत पाटील यांनी सांगितले.
राज्यात येणार्‍या काळात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. स्थानिक नेतृत्वाने सर्वांना एकत्र बसवून महाविकास आघाडी एकत्र रहावी असे प्रयत्न करणे अपेक्षित होते. गोंदियामध्ये नाना पटोले म्हणतात त्याप्रमाणे वेगळं काही झाले असेल तर पक्ष त्याची नोंद घेईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
स्थानिक नेत्यांचे कुणाशी पटते तर कुणाशी पटत नाही. काही ठिकाणी टोकाची मतमतांतरे असून याचादेखील दुसर्‍या बाजूने विचार करून घेण्याची आवश्यकता आहे. गोंदियाच्या बाबतीत नाना पटोले यांनी संपर्क साधला होता. मात्र स्थानिकदृष्टया मनं दुभंगलेली असल्यामुळे अडचणी निर्माण होत असाव्यात, असेही ते म्हणाले.

About Editor

Check Also

देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव देण्यास मान्यता महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय

“महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *