राज्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर जोरदार हल्ला चढवित शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर महायुती सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला राज्यातील महायुती सरकारवर केली.
या कायद्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ब्रिटीश सरकारच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील रौलेट ॲक्टच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस पवार सरकार ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ अध्यादेशाद्वारे आणणार असल्याचे समजते. कोणताही कायदा तयार केला जात असताना त्यावर विधी आयोगाकडून मत घेणे, जनतेकडून व तज्ञांकडून अभिप्राय घेणे आणि विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यावर सखोल चर्चा होणे अशी प्रक्रिया असताना सरकार कोणालाही न जुमानता हा पाशवी कायदा अध्यादेशाद्वारे आणत असल्याची टीकाही यावेळी केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले की, या कायद्याने पोलिसांना अमर्यादित अधिकार दिले जाणार असून कोणतीही कारणे उघड न करता एखाद्या संघटनेला ‘बेकायदेशीर’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार शासनाला यातून प्राप्त होणार आहेत. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली या राज्यातील पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसत असल्याचा आरोपही महायुती सरकारवर केला.
तसेच पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, हे विधेयक घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन करणारे घटनाविरोधी विधेयक असून सर्व विरोधी पक्षांचा या विधेयकाला पूर्णपणे विरोध असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya