मुंडे स्मारकावरून एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न सरकार टाळाटाळ करत असल्याचा भगवान महासंघाचा आरोप

औरंगाबाद : प्रतिनिधी
लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासाठी औरंगाबादमध्ये जागा आणि निधी देऊन देखील सरकार हेतुपूरस्पर टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन डोईफोडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. गोपीनाथ मुंडे यांचे शहरात भव्य स्मारक व्हावे आणि त्यातून तरूणांनी प्रेरणा घ्यावी या हेतून तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शहरातील शासकीय दुध डेअरीची जागा दिली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी निधी पांडे यांच्या समक्ष स्मारकाची जागा निश्‍चित करून निधीसाठीचा प्रस्तावही शासनाकडे पाठवला होता.
मंत्रिमंडळ बैठकीत देखील या प्रस्तावाला मान्यता देऊन निधी देखील देण्यात आला. परंतु त्यानंतर मात्र स्मारकाचे काम रखडले असा आरोप जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी केला.
खेड्यापाड्यात, तांडे, वस्तीवर भाजप पोहचवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा सिहांचा वाटा होता. राज्याला कार्यशील आणि गतीशील करण्यात त्यांचे योगदान आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असतांना गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी केलेले काम कधीही विसरता येणार नाही. तरूण पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने मुंडे यांचे स्मारक उभारण्याची संकल्पना पुढे आली होती. परंतु केंद्रात व राज्यात सत्तेत असलेल्या भाजपला खऱ्या अर्थाने सोनेरी दिवस दाखवणाऱ्या गोपीनाथ मुंडेची याच सरकारकडून अवहेलना केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
गोपीनाथ मुंडेच्या स्मारकास होणाऱ्या विलंबाच्या विरोधात यापुर्वी जय भगवान महासंघाच्या वतीने वेळोवेळी रास्तारोको, निदर्शने, आंदोलने करण्यात आली होती.

About Editor

Check Also

खानवडीत ‘ज्योती-सावित्री जिल्हा परिषद शाळेचे ’मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण देण्याचा निर्णय हे महात्मा फुले यांना खरे अभिवादन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना लोकसभा व विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *