आघाडीच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिली “ही” माहिती भाजपा आपल्या भूमिकेवर ठाम

राज्यसभा निवडणूकीतील संभावित घोडेबाजार रोखण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत समझौता करण्याचा प्रयत्न केला. जवळपास महाविकास आघाडीचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील यांच्यासोबत एक तासाहून अधिक काळ चर्चा केली. त्यानंतर या बैठकीतील चर्चेची माहिती देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की,भाजपा तीन जागा लढविण्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले.
या चर्चेच्यावेळी महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार तर भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते.

महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीस यांना फोन आला होता. त्यानुसार छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनिल केदार हे भेटण्यासाठी आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज ३ वाजेपर्यंत माघार घेण्याचा वेळ आहे. गेल्या २० वर्षापासून राज्यसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका बिनविरोध घेण्याची परंपरा आहे. पण निवडणूक तथ्यांच्या आधारे बिनविरोध होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की भाजपाला राज्यसभेच्या तिन्ही जागा मिळाव्यात आणि विधान परिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचार करता येईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले.

उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत होती. मात्र आघाडी किंवा भाजपाने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी स्पष्ट केले.
तर शिवसेनाही दुसरी जागा लढणार असून महाविकास आघाडीचे चार उमेदवार नक्कीच निवडून येतील, असा विश्वास शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

प्रत्यक्ष निवडणूक झाल्यास अपक्ष व छोटय़ा पक्षांच्या २९ आमदारांना महत्त्व येणार आहे. तसेच राजकीय पक्षांच्या आमदारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना सुरक्षित स्थळी हलविले जाणार असल्याचे ही सांगण्यात येत आहे .

राज्यसभेची निवडणूक संपताच विधान परिषदेची निवडणूक होत आहे. राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याकरिता महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये पडद्याआडून चर्चा सुरू असल्याचे बोलले जात होते. परंतु अशी कोणतीही चर्चा झालेली नाही वा तशी आवश्यकता नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

याआधी २०१० मध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा मतांची मोठय़ा प्रमाणावर फाटाफूट होऊन काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता, तर भाजपाच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. तत्पूर्वी २००८ मध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट होऊन पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकांमध्ये राज्यात यापूर्वी धक्कादायक निकाल लागले होते. त्यामुळे या निवडणुकीतही चुरस असल्याने धक्कादायक निकालाची शक्यता व्यक्त कऱण्यात येत आहे.

About Editor

Check Also

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती

राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *