विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपाला धडा शिकविण्याचा चंग बांधलेल्या मराठा आरक्षण समर्थक आणि आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्याच्या विविध भागात मराठा समाजाचे उमेदवार उभे कऱण्याचे आदेश दिले. त्यानंतर निवडणूकीचे गणित म्हणून दलित मुस्लिम मराठा समाजाच्या धर्मगुरुंची आणि प्रभावशाली व्यक्तींची बैठकही घेतली. त्यानंतर उमेदवारी माघारी घेण्याच्या दिवशी आपण मराठा समाजाचे उमेदवार आणि मतदारसंघ जाहिर करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी ४ नोव्हेंबर रोजी मराठा समाजाचे उमेदवार आणि विधानसभा मतदारसंघ जाहिर करणार असल्याचे आज जाहिर केले.
मागील काही दिवसांपासून सत्ताधारी महायुतीतील पक्षाची उमेदवारी जाहिर अनेक उमेदवार मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरावली सराटीला जात आहेत. तसेच मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्याची विनंती करत आहेत. तर दुसऱ्याबाजूला मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या इच्छुक उमेदवारांना परस्पर उमेदवारी अर्ज भरायला लावले असून राखीव जागांवर उमेदवारी अर्ज शक्यतो टाळले आहेत.
मनोज जरांगे पाटील बोलताना म्हणाले की, मतदारसंघ आणि उमेदवारांबाबत आज चर्चा झाली आहे. तसेच मतांचे गणित जुळविण्यात चांगल्यापैकी यश आले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर तुम्ही तुमच्या बैठका घेऊन उमेदवार कोण याबाबत निर्णय ठरवा असे मराठा समाजाच्या उमेदवारांना आवाहन केले. जर उमेदवार एकमताने निवडला नाही तर त्याबाबतचा निर्णय आम्ही घेऊ असेही यावेळी सांगितले. तसेच उद्या सर्वांनी अंतरावली सराटीत फक्त उमेदवारांनी यायचे असून इथे आल्यानंतर उमेदवारांना आवश्यक त्या सूचना देण्यात येणार असून उमेदवारांनी सोबत कोणाला आणू नये असेही यावेळी सांगितले.
त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना सांगितले की, ज्या ठिकाणी मुस्लिम, दलित आणि मराठा समाजाचे मतदान एकत्रित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झालेली आहे. तसेच त्यावर शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना दलित आणि मुस्लिम समाजाची मते मिळतील असा विश्वास व्यक्त करत राखीव जागांवर जो उमेदवार मराठा आरक्षणाच्या बाजूचा असेल त्याला मराठा समाज मतदान करेल असेही यावेळी स्पष्ट केले.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मतदारसंघाबाबतचा निर्णय झालेला आहे. आता उमेदवारांच्या बाबत उद्या बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचेही यावेळी सांगितले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी प्रकाश आंबेडकर यांचे बंधु आनंदराज आंबेडकर आणि राजरत्न आंबेडकर हे अंतरावली सराटीला गेले होते. तसेच मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरुही अंतरावली सराटी येथे गेल्याचे दिसून आले.
Marathi e-Batmya