राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून मागील काही महिन्यापासून मराठा आरक्षण समर्थक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आता नव्याने पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची घोषणा केली. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात त्या विरोधात याचिका करण्यात आल्या. त्यावर मुंबई उच्च न्यायालयानेही मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत दिर्घकाळ आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. त्यानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांना आझाद मैदानावर एक दिवसाचे आंदोलन करण्यास परवानगी देण्यात आली.
आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेली मनोज जरांगे पाटील यांची रॅली आज जुन्नर येथे पोहोचली. तेथील शिवनेरी किल्ल्यावर मनोज जरांगे पाटील जात शिवरायांचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून द्यायचं होतं, त्यांनी तर आंदोलनाला परवानगी दिली. पण यातून महाराष्ट्रात वेगळा संदेश गेला. ते न्यायालयाकडे बोट दाखवत होते. पण शेवटी त्यांनीच परवानगी दिली. त्यामुळे ते एक दिवसाची परवानगी देऊ शकतात आणि मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकतात. पण त्यांनी जाणून बुझून एकच दिवसाची परवानगी दिली. तुम्ही मोठं मन दाखवयला हव होतं अशी टीका केली.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या वेदना समजून घ्यायला हव्यात. मराठा समाजाच्या योगदानाची मुख्यमंत्र्यांनी कदर करायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुंबईत कोणत्याच आंदोलकाला आझाद मैदानावर जाण्यापासून रोखणार नाहीत. आणि गरिबांच्या वेदनेचा सन्मान करतील अशी आम्हाला आशा आहे. पण आंदोलनासाठी एक दिवसाची परवानगी ही मराठ्यांची चेष्ट असल्याची टीकाही यावेळी केली.
शेवटी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, याचं बहुमताचं सरकार मराठ्यांच्या मतांवरच आलं आहे. तुमच्या विरोधात मराठ्यांची लाट आली तर येणारे दिवस तुमचं राजकिय करिअर बरबाद करणारे असतील मी वारंवार सांगितलय आजही तेच पुन्हा सांगतोय… फडणवीसांना आता योग्य संधी आहे, संधीचं सोनं करा मराठ्यांची मनं जिंकण्याची संधी आहे. तुम्ही मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करा, हेच मराठे गुलाल टाकून मरे पर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचे उपकार विसरणार नाही हा आमचा शब्द असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya