Breaking News

नाना पटोले यांची टीका,…निवृत्ती योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढली

महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला आहे. असंवैधानिक शिंदे फडणवीस सरकारच्या काळात गुंडांना सरकारी आशिर्वाद मिळत असल्याने गुन्हेगारांची हिम्मत वाढली आहे. महिला घरात व घराबाहेरही सुरक्षित नाहीत तर शाळेत मुलीही सुरक्षित नाहीत. आता तर कायद्याचे रक्षक पोलीसही सुरक्षित राहिले नाहीत. मुंबईतील माहिम पोलीस कॉलनीत एकाचवेळी १३ पोलिसांच्या घरावर दरोडा पडला व काल पुण्यात पोलीस उपनिरिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. राज्य सरकारच्या आशिर्वादाने गुंडांची हिम्मत वाढल्याने पोलीसांवरही हल्ले होत आहेत अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

टिळक भवनमध्ये पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुढे म्हणाले की, भाजपा युती सरकारने पोलिसांना कमजोर बनवले आहे. या सरकारच्या काळात गुंडांना सरकारी ताकद मिळली आहे. काही गुंड मुख्यमंत्र्यांसोबतच फिरत आहेत तर काहींना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली, काहींना उपचाराच्या नावाखाली हॉस्पिटलमध्ये भरती करुन फाईव्हस्टार सेवा पुरवली जात आहे. सरकारचा आशिर्वाद असल्यानेच गुंड पोलिसांवर हल्ला करण्याची हिम्मत करत आहेत. या सरकारच्या काळात सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही, सरकार बेशरम असून जनतेला वाऱ्यावर सोडून सर्व बाजूंनी लुटण्याचे काम सुरु आहे.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जळगावच्या कार्यक्रमातही खोटे बोलले. महिलांच्या संदर्भातील शक्ती कायदा राष्ट्रपतींकडे दोन वर्षांपासून पडून आहे तो मंजूर केला जात नाही आणि गप्पा महिला सुरक्षेच्या मारत आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकरी योजनांबद्दल बोलले पण पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्याला पंतप्रधानांकडे काहीच अर्थ नाही असे दिसले. मुख्यमंत्री शिंदेंनी पुंगी वाजवली पण त्याचा काही उपयोग झाला नाही. जो भारतीय जनता पक्ष शेतकऱ्यांना अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणतो त्यांना शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटत नाही. लखपती दीदी ही योजनाही फसवी आहे. १ लाख रुपयांचे कर्ज आधीच मिळत होते ते ५ लाख केले पण त्यासाठी भरमसाठ अटी घातल्या आहेत. त्यामुळे या योजनेचा फायदा होण्यापेक्षा तोटाच होणार असल्याची टीका केली.

नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की, केंद्र सरकारने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे तशीच राज्यातही ही योजना लागू करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. या योजनेत कर्मचाऱ्यांचा पैसाच कपात करुन त्यांना दिला जाणार आहे. वास्तविक पाहता जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी असताना ती काय लागू केली जात नाही हा प्रश्न असून सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये यावर तीव्र नाराजीही व्यक्त केली.

मुंबई-गोवा एक्सप्रेसच्या कामावर टीका करताना नाना पटोले म्हणाले की, मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन सरकारने अधिवेशनात दिले होते, सहा महिने झाले अजून या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. हा महामार्ग ठेकेदारांसाठी आहे, कोकणच्या लोकांसाठी नाही. ठेकेदारांना पैसे मिळावेत म्हणून या रस्त्याची रखडपट्टी सुरु आहे. आता मुख्यमंत्री तिथे काय इव्हेंटबाजी करायला गेले आहेत काय, असा सवालही यावेळी उपस्थित केला.

शेवटी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी काही लोकांसह चाकण येथील मर्सिडीज बेंझच्या प्रकल्पाला अचानक भेट देऊन कंपनीने पर्यावरण नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. या भेटीमागे कदम यांचा काही उद्देश होता का, नियमानुसार ही भेट दिली की आणखी काही कारण होते. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत, बेरोजगारी वाढत आहे. मर्सिडीज सारख्या कंपन्या राज्यातून गेल्या तर मोठे नुकसान होऊ शकतो. ही भेट होती की धाड होती असा खोचक सवाल करत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार काय करतात असा उपरोधिक सवालही यावेळी केला.

Check Also

भाजपा सोलापूरातील एका आमदाराला घरी बसविणार वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये खलबतं सुरु

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपाकडून पुन्हा सत्तेत येण्याच्या अनुषंगाने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *