मुंबईः प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजूत काढूनही सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले.
विशेष म्हणजे यापैकी वैभव पिचड, संदीप नाईक आणि कालीदास कोळंबकर हे विधानसभाध्यक्ष बागडे यांच्या राजीनामा देण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यासोबत एकाच गाडीत आले. त्यामुळे या चारही आमदारांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून लवकरच भाजप प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिवेंद्रराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर संदीप नाईक यांच्या राजीनाम्यामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस संपण्याच्या मार्गावर उभी ठाकली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Marathi e-Batmya