केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला आणि उध्दव ठाकरे गटाला मनाई केली. या साऱ्या राजकिय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चिंता व्यक्त करत शिंदे गटाबरोबर शिवसेनेलाही टोला लगवला. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी वक्तव्य केले.
यावेळी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, राज्यातलं वातावरण राजकीयदृष्ट्या अस्थिर आहे. असं राजकारण गेल्या ३०-४० वर्षांत राज्यात कधीही पाहिलं नाही. एकमेकांच्या विरोधात व्यक्तिगत पातळीवर आरोप करणं हे कधीही झालं नाही. विरोधासाठी विरोध व्हायचा. पण नंतर सगळे एकत्र यायचे. आता शत्रुत्व असल्यासारखं सगळं चालू आहे. चिन्ह गोठवणं, आपल्याच पक्षात अशी बंडखोरी करणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. राज्याच्या हिताच्या दृष्टीने हे योग्य नाही असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंनी मेहनत केली. धनुष्य बाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. या धनुष्य बाणाच्या जोरावर महाराष्ट्रात सत्ता काबीज केली. राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले. पण ही वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणात गोठवली गेली. यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा, अशी चिंताही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमावलं, ते एका मिनिटात मुलांनी घालवलं. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल. पण निवडणूक चिन्ह तात्पुरतं का होईना, गोठवलं जाणं हे क्लेशदायी आहे असल्याचे त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya