पवारांच्या “त्या” वक्तव्याने दंगली थांबल्या तर फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का?-महेश तपासे

शरद पवारांनी जर एखादं वाक्य बोलून शेकडो लोकांचे प्राण वाचवले असतील… दंगली रोखल्या असतील तर त्याच्यामध्ये फडणवीसांना दुःख वाटण्याचं कारण काय? ९३ च्या बॉम्बस्फोटानंतर मुंबईत दंगली घडाव्यात हा कदाचित भाजपचा उद्देश होता का? हे फडणवीस यांनी स्पष्ट करावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संदर्भामध्ये काही ट्विट केले त्याला महेश तपासे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार जातीवादी आहेत असा फडणवीस यांचा एकंदरीत सूर होता. मात्र महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची वाढ पाहता आता पक्षाला जातीयवादी घोषित करणे एवढंच भाजपाकडून बाकी होतं आणि त्याची सुरुवात भाजपाचा नवीन फ्रंटमॅन राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये केल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या ५०-५५ वर्षात देशाचे नेते शरद पवारांनी समाजातल्या मागासलेल्या, अशिक्षित, दुर्बल अशा लोकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं सकारात्मक काम केलेले आहे. हे करत असताना जात आणि धर्म हे कधीच पाहिले नाही. घटना समितीचे प्रमुख डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील आरक्षणा संदर्भामध्ये समान संधी आणि मागासलेल्या समाजाच्या मागण्या या दोन गोष्टी सांगितल्या होत्या. कलम ३७० रद्द केल्यानंतर त्यांच्या अवतीभवती एक राष्ट्रीय व्यापक पॉलिटिकल अजेंडा २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजपाकडून निर्माण करण्यात येत होता. महाराष्ट्रामध्ये प्रचाराच्या दरम्यान पवारसाहेबांनी ३७० पेक्षा शेतकरी आत्महत्या आणि वाढती बेरोजगारी हे महाराष्ट्रासाठी अधिक महत्त्वाचे आहे असे विधान केले होते. त्या गोष्टीचा विपर्यास करून देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी आपले ट्विट केल्याचे त्यांनी सांगितले.

जस्टीस राजेंद्र सच्चर यांच्या अध्यक्षतेत मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाकरीता एक उच्चस्तरीय समितीचे गठण करण्यात आले आणि त्या समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करा असे जर पवारांनी म्हटले तर त्यात गैर काय? असा सवाल करत मंडल आयोगाची स्थापना जनता पार्टीचे तत्कालीन देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी केली होती हे देवेंद्र फडणवीस विसरले का? आणि त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पवारांनीच केली. त्यामुळे फडणवीस यांना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीच्या संदर्भात पण हरकत आहे का? असा खोचक सवालही त्यांनी यावेळी केला.

१९९३ ला मुंबईमध्ये बारा साखळी बॉम्बस्फोट झाले होते. पवारांनी तातडीने दूरदर्शनवरून मुंबईत तेरा स्फोट झाले असून तेरावा स्फोट हा मस्जिद बंदर या मुस्लिम बहुल वस्तीत झाला अशी घोषणा केली होती. पवारसाहेबांच्या या घोषणेमुळे मुंबईमध्ये धार्मिक हिंदू-मुस्लिम क्लेश टळला आणि शेकडो लोकांचे प्राण वाचले. श्रीकृष्ण आयोगानेदेखील पवारांच्या या चतुराईचे समर्थन केल्याची आठवण करून देत त्यानंतर मुंबई दोनच दिवसांमध्ये पूर्व परिस्थितीप्रमाणे नॉर्मल झाल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया जोरात असताना काश्मिरी पंडितांच्यासोबत मुस्लिम, शीख, बौद्ध व इतर समाज यांच्यावरही फार मोठे अत्याचार झाले आणि त्यांनाही आपली घरे सोडावी लागली. परंतु काश्मिर फाईल्स हे फक्त काश्मीर पंडितांवरच हल्ला झाल्याचे एकतर्फी चित्र त्या चित्रपटाचे रंगवण्यात आले आहे. त्यामागे भाजपाचा काय राजकीय हेतू आहे हे आता भारतातल्या सबंध जनतेला समजलेला आहे. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून काश्मिरी नागरिकांच्या पुनर्स्थापनेसाठी काश्मीर खोऱ्यामध्ये काय प्रयत्न केले हेही देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगावे अशी मागणीही त्यांनी केली.

About Editor

Check Also

नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी

राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *