आमच्या मित्रपक्ष असलेल्या दलित मुस्लिमांनी यांनी त्यांच्या उमेदवारांची यादी दिली नसल्याने आम्ही निवडणुकीत माघार घेतली, असे मनोज जरांगे पाटील सांगत आहेत. परंतु त्यांच्या बोलण्यात अजिबात तथ्य नसल्याचे सांगत आम्ही दलित आणि मुस्लिम उमेदवारांची यादी जरांगे यांच्याकडे काही दिवसां आधीच दिली होती, असा गौप्यस्फोट राजरत्न आंबेडकर यांनी केला.
राजरत्न आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सामाजिक समीकरण जुळवून आणण्याचा निर्धार व्यक्त केला होता. मात्र जरांगे यांच्या निवडणूक माघारीच्या निर्णयावर त्यांनी नापसंती व्यक्त केली.
राजरत्न आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, त्यांच्या या निर्णयाचा मी आदर करतो, पण माघार घेण्यामागचे त्यांनी दिलेले कारण खोटे आहे. अनेकांनी जमिनी विकून, नोकऱ्या सोडून लोक निवडणुकीसाठी तयार झाले होते. मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानुसार अनेकांनी अर्ज भरले. पण जरांगेनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे अनेकांची अडचण झाली.
पुढे बोलताना राजरत्न आंबेडकर म्हणाले की, दलित आणि मुस्लिमांनी यादी दिली नाही म्हणून माघार घेतली असल्याचे जरांगे म्हणाले. ते मात्र जरांगे चुकीचे आहे, आम्ही त्यांच्याकडे यादी अगोदरच सुपूर्द केली होती, असा दावा करत आंबेडकर म्हणाले की जरांगे यांनी लोकांची दिशाभूल करू नये. मराठा समाजातील आणि दलित समाजातील अनेकांचे मला फोन येत आहेत. तुम्ही यादी का दिली नाही ? अशी विचारणा करणारे फोन आल्याने त्यांना काय उत्तरे देऊ? असा सवालही यावेळी करत मी त्यांना वस्तुस्थिती सांगतो आहे. इतके उमेदवार होते की बऱ्याच जणांना माघार घ्यायला लागली असती. परंतु यादीचे कारण पुढे करून जरांगे वेळ मारून नेत आहेत, असा खुलासाही यावेळी केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची अनेकदा भेट घेतली होती. मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. आम्ही तुमच्यासाठी फक्त मत देणारे साधन आहोत का? असा सवाल करीत मनोज जरांगेंच्या केसालाही धक्का लागला तर येणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी किंवा विरोधक दोन्ही पक्षांना प्रचारासाठी उतरू देणार नाही अशी परिस्थिती निर्माण करू असा इशारा त्यांनी दिला होता. त्यावेळी जरांगे यांची तब्येत ढासळलेली पाहून राजरत्न आंबेडकर यांच्या डोळ्यात पाणी आले होते.
Marathi e-Batmya