मुंबईः प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणूकीला सामोरे जाण्यास अवघे तीन महिने राहीले आहे. या निवडणूकीच्या दृष्टीने मतपेटी घट्ट करण्यासाठी मित्रपक्षांकडून दगाफटका होवू नये या उद्देशाने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा निर्णय जवळपास झाला आहे. त्यानुसार रिपाई (आठवले गट) यांच्या कोट्यातील मंत्रीपदासाठी रामदास आठवलेंना मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता त्यांनी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत अविनाश महातेकर यांचे नाव सुचविण्यात आल्याचे जाहीर केले.
२०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी रासप, शिवसंग्राम संघटना, रिपाई, स्वाभिमानी शेतकरी पक्ष आदी मित्रपक्षांना राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रासप, स्वाभिमानी, शिवसंग्राम आदींना मंत्रीपदे देण्यात आली. मात्र रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद देत राज्यात झुंजवत ठेवले. परंतु विधानसभेची निवडणूक जवळ आल्याने आणि दलित समाजाची मते मिळविण्यासाठी रिपाईला एक मंत्रिपद देण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्याकडे संभावित मंत्रिपदासाठी नाव देण्यासाठी सांगितले. त्यावर आंबेडकरी विचारवंत अविनाश महातेकर यांचे नाव रामदास आठवले यांनी सुचविल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
Marathi e-Batmya