शरद पवार यांनी पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे केले अभिनंदन भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखली

आपल्या छातीवर गोळ्या झेलून भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सैन्यदलावर प्रत्येक भारतीयाचा पूर्ण विश्वास आहे. आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी एअर स्ट्राईक करून, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. या कारवाईत पाकिस्तानी नागरिक किंवा पाक लष्कराच्या कोणत्याही ठिकाणाला धक्का न लावता, अतिरेक्यांच्या नऊ लक्ष्यांवर अचूक आणि नियोजित हल्ला करण्यात आला. भारतीय सैन्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांची सुरक्षा अबाधित राखणाऱ्या तसेच पहलगाम हल्ल्याचा योग्य प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व भारतीय जवानांचे मन:पूर्वक अभिनंदन! असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, गेल्या आठवड्यामध्ये काश्मीरमध्ये काही घडलं त्यामुळे साहजिकच संबंध देशात आणि लोकांमध्ये अस्वस्थता होती. पलीकडने लोक येतात आणि ज्यांचा काही संबंध नाही अशा लोकांना गोळ्या घालतात. यामध्ये कोणत्याही सरकारला लगेच भूमिका घेणं शक्य नाही. हे करत असताना काळजीपूर्वक निकाल घ्यायची गरज होती. भारत आणि पाकिस्तानच्या नकाशा निर्देश करून ठेवा. त्याच्यामध्ये पाकव्याप्त काश्मीर POK चा भाग पाकिस्तानने घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे. पीओके मध्ये दहशतवादी यांचे कॅम्प आहेत, तिथे दारू गोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. हिंदुस्थान आणि पाकिस्तान बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली. पीओकेमध्ये हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झाले. घटना घडल्यानंतर संपूर्ण काश्मीर मध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली. काश्मीरमधील विधानसभेत एकमताने निषेधाचा ठराव झाला, त्यामुळे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका दहशतवाद विरोधात केली. २६ ते २७ लोकं मृत्यूमुखी पडले होते त्याचा हिशोब करायचा होता. मात्र हे करत असताना आंतरराष्ट्रीय जगामध्ये भारत आक्रमक आहे असं चित्र होऊ नये अशी खबरदारी घेतली हे योग्य असल्याचे सांगितले.

शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, सुदैवाने या हल्ल्यानंतर अमेरिका ,जपान आणि काही महत्त्वाचे देश यांनी भारताला संरक्षण दिले. पण काळजी करण्यासारखी गोष्ट अशी आहे की चीनने ते दिलेलं नाही. ठिक आहे. शेवटी आपल्याला आपल्या देशाचे महत्त्व, अधिकार आणि सार्वभौमत्त्व जतन करावं लागेल. यासाठी कष्ट देशवासीय म्हणून करावे लागतील ती मानसिकता सर्वांची दिसते ही जमेची बाजू आहे. हा जो सगळा भाग आहे त्या सतर्क राहण्याची गरज आहे. पाकिस्तानला त्यांची आणि भारताची ताकद माहिती आहे. त्यामुळे यावेळी आपल्याला सावध रहावं लागेल. आपल्या फोर्सेस आणि पंतप्रधानांनी जे काही निर्णय घेतले ते योग्यच घेतले. काही निष्पाप भगिनींचे कुंकू पुसले गेले होते. त्यामुळे जर हे नाव दिले असेल तर योग्य असल्याचे मतही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना शरद पवार म्हणाले की, दरम्यान, सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्हा लोकांचा आग्रह होता की, सरकार कोणतीही भूमिका घेत असताना राजकारण न आणता पूर्ण ताकदीने सरकारच्या पाठिमागे उभं राहावं हा निर्णय घेतला. आता या कारवाईनंतर संबंध देशवासी आणि राजकीय नेतृत्वाची जबाबदारी आहे की एअर फोर्स आणि त्यांचे सहकारी त्यांच्या पाठिशी मजबुतीने उभं रहावं, असं आवाहनही केले.

About Editor

Check Also

माणगाव, तळा व म्हसळातील आदिवासी लाभार्थ्यांसाठी घरकुलासाठीचा प्रस्ताव सादर करा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे आदेश

माणगाव, तळा व म्हसळा नगरपंचायत हद्दीतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना आदिवासी घरकुल योजना (शहरी) अंतर्गत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *