अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसानीची भरपाई सरकारकडून अजूनही मिळाली नाही,केंद्राकडून इतर राज्यांना मदत झाली आपल्य राज्याला मदत मिळाली नाही, राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही, हे आम्हाला सभागृहात दिलेल्या उत्तरातून समजले आहे, एकही मंत्री अवकाळी पाऊस जिथं झाला तिथं गेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले आहे.
शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, महायुतीमध्ये आलबेल आहे, आपल्या खुचीला स्थिर करण्यासाठी किंवा स्वतःला भक्कम दाखवण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू आहे, प्रत्येक जण काही ना काही ऑपरेशन करत आहे, पण ऑपरेशन तुतारी होणार नाही, याची मी खात्री देतो, अशी हमीही यावेळी बोलताना दिली.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे सरकार गांभीर्याने पाहत नाही आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नापेक्षा निवडणुका कशा जिंकायच्या याचे तंत्र त्यांना माहित पडल्यामुळे सामान्य लोकांकडे लक्ष देण्याची सरकारला गरज वाटत नसावी, सरकार सत्ताकरणात व्यस्त आहे. आज मुख्यमंत्री आसामच्या दौऱ्यावर गेले आहेत. पण अद्याप एकही मंत्री अवकाळी पाऊस झालेल्या ठिकाणी भेट देण्यासाठी गेलेला नाही, हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच दुर्दैव आहे, असे सांगितले आहे.
सातारा प्रकरणात एसीपीच्या सक्तीच्या रजेची चर्चा सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांची फसवणूक झाली असं म्हणायचं का? या पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना शशिकांत शिंदे म्हणाले की, मला सांगावसं वाटत की ज्या अर्थी एसपीना रजेवर पाठवलं याचा अर्थ तिथे चुकीच झालं हे अप्रत्यक्षपणे राज्य सरकारने कबूल केल्याचं दिसतं. नाहीतर ते रजेवर गेले नसते. रजेवर पाठवलं म्हणजे यंत्रणेचा गैरवपार केला हे सिद्ध झालं, असेही स्पष्ट केले.
पुढे बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले की, आमची मागणी ही आहे की, ते अर्जित रजेवर गेले असतील तर ते चुकीचं आहे. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं पाहिजे. सक्तीच्या रजेबद्दल बोलताना काल मुख्यमंत्री म्हणाले की, या सर्व गोष्टींच्या बाबतीत चौकशीत कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये म्हणून रजेवर पाठवलं आहे. आमची मागणी आहे की, चौकशी लवकरात लवकर करुन चुकीचं काही झालं असेल तर निवडणूक प्रक्रिया रद्द झाली पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.
Marathi e-Batmya