विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर इच्छुक आयाराम गयारामांचे पक्ष प्रवेशाचे सोहळे सुरू झाले आहेत. त्यातच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना उबाठा नेत्यांमध्ये जागा वाटपावरून पहिली ठिणगी पडली आहे. आज सांगोल्याचे दिपक आबा साळुंखे यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्यानंतर शिवसेना उबाठाचे नेते संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांच्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटप थांबले असल्याचा आरोप केला. त्यावरून नाना पटोले यांनीही अंबादास दानवे आणि संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. मात्र उद्धव ठाकरे म्हणाले की, तुटेपर्यंत ताणू नका, माहिती घेतो असे सांगत काँग्रेसला इशारा दिला.
या आरोपाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, संजय राऊत हे कदाचित उद्धव ठाकरेसाहेबांपेक्षा मोठे नेते असतील. त्यांना उद्धव ठाकरे यांच्याशी बोलावे लागत नसेल. पण आमच्या पक्षात प्रोटोकॉल आहे. आमचे पक्षश्रेष्ठी दिल्लीत आहेत. आम्हाला सर्व निर्णयांची माहिती दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना द्यावी लागते.तिकडे जयंत पाटील यांना सर्व माहिती शरद पवार यांना द्यावी लागते. कदाचित शिवसेनेत ही पद्धत नसेल. तर तो त्यांचा प्रश्न असल्याचा पलटवार केला.
जागा वाटपाच्या मुद्यावरून संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात खटके उडत असल्याच्या मुद्यावरून शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी याबाबत माहिती घेऊन नंतर बोलेन.
त्यावर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न केला की, विदर्भातील जागेवरून मतभेत आहेत. यावरून काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी काही बोलणे झाले का नाही असे विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, एकापेक्षा जास्त पक्ष जेव्हा एकत्रित निवडणूक लढवित असतात तेव्हा जागा वटापावरून थोडीशी तणातणी होत असते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्व पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. पण मोठा तंटाबखेडा झाला असे वाटत नसल्याचे सांगितले.
यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले की, जागा वाटपावरून कोणताही वाद नाही. शेवटी राजकिय जीवनातील भीष्माचार्य हे महत्वाची भूमिका बजावतील, पक्षांमध्ये कोणतेही वाद नाहीत. दोन नेत्यांमध्ये खटके उडाले आहेत. मात्र त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होणार नसल्याचे सांगितले.
Marathi e-Batmya