शिंदे-फडणवीस सरकारबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान, हे सरकार फार काळ… भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्यात प्रासंगिक करार

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाळी माजवित एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. मात्र त्यानंतरही १० दिवसानंतर राज्यात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन झाल्यानंतर राजकिय वर्तुळात आणि सर्वसामान्य नागरीकांमधून वेगवेगळ्या पध्दतीचे तर्क व्यक्त करण्यात येत आहेत. यापार्श्वभूमीवर शिंदे सरकारला २४ तासही उलटत नाहीत तोच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबाबत भाकित केले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडल्यानंतर महाराष्ट्रातला सत्तासंघर्ष संपल्याची चिन्हे दिसत असल्याचे मत काहीजणांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबाबत भाकित करत असताना ते म्हणाले की,  तोपर्यंत हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे मोठे विधान केले.

भारतीय जनता पक्षालाही माहीत आहे, की हा प्रासंगिक करार आहे. हे सरकार किती दिवस टिकणार आणि २०२४ साली ते पुन्हा निवडून येतील किंवा नाही, याबाबत शंका आहे. मला तर वाटतंय २०२४ आधीच निवडणुका होतील, त्यावेळी हे सगळे निवडून येतील किंवा नाही, याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना देखील आहे. त्यामुळे यांच्यावर किती अवलंबून राहायचं हे, भारतीय जनता पक्ष ठरवेल असेही ते म्हणाले.

दरम्यान, राजकिय वर्तुळात केवळ अन् केवळ उध्दव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी भाजपाने शिवसेनेत अंतर्गत बंडाळी घडवून आणल्याची चर्चा राजकिय वर्तुळात सुरु आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी स्वत:ला मुख्यमंत्री बनविण्यासाठी इतर शिवसैनिकांना संधी नाकारल्याची चर्चाही भाजपाने घडवून आणल्याचे अफवा पसरविल्याने शिवसेनेत बंडाळी झाल्याचेही बोलले जात आहे.

तर दुसऱ्याबाजूला एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या ताब्यातील मुंबई महापालिका हिसकावून घेण्यासाठी बंडाळी करायला भाग पाडले. त्यासाठी एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू खाजगी सचिव जोशी यास एका प्रकरणात ईडीकडून नोटीस बजाविण्यात आली. त्यानंतर जोशी हे गायब झाले असून याच खाजगी सचिवाच्या मार्फत एकनाथ शिंदे यांच्या भोवती ईडीची कारवाई पोहोचवायची अशी रणनीती भाजपाने आखली होती. त्यानुसार या खाजगी सचिवाला नोटीस पोहोचली आणि एकनाथ शिंदे हे गडबडले आणि त्यांनी भाजपाची साथ धरल्याची चर्चा दस्तुरखुद्द ठाणे शहरातच रंगली आहे.

तसेच या सरकारच्या सत्तेची धुरा भाजपाच्याच हातात रहावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ केंद्रीय नेत्यांनी घ्यायला लावल्याची माहिती तर उघडच असल्याचेही बोलले जात आहे.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *