बीड मधील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख अपहरण व हत्या प्रकरणात आता नवा खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांना बदनाम करण्याचा डाव आखण्यात आला होता मात्र पोलिसांचा तो डाव फसल्याचे आमदार धस यांनी म्हटले आहे. या प्रकरणी तपास कामा दरम्यान एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी धस यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे केली आहे.
भाजपा आमदार सुरेश धस म्हणाले की, संतोष देशमुखला उचलून कळंबला न्यायचे तिथे एक महिला तयार करून ठेवली होती. त्या महिलेसोबत संतोष देशमुख झटापट झाल्याचे भासवायचं आणि महिलेचा विनयभंग केला असल्याचे सांगायचे म्हणून आम्ही याला मारले अशा प्रकारचा प्लान होता. मात्र त्याआधीच संतोष देशमुखचा अंत झाला त्यामुळे त्याच्या बदनामीचा प्लॅन फसल्याचा खळबळजनक खुलासा धस यांनी केला. तसेच संतोष देशमुख खून प्रकरणात एसआयटी नेमण्यात आली आहे त्या एसआयटीमध्ये दोन सायबर सेलच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी केली आहे. काही आरोपींनी दहा तारखेच्या नंतर आपले मोबाईल बंद करून ते गोदावरी नदीमध्ये फेकलेत त्यामुळे अडचणी येत आहे. अशी आम्हाला माहिती मिळाली आहे. महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाच्या तपासाला विलंब लागला आहे आणि त्यांच्या विलंबाला कारणीभूत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कारण महादेव मुंडे प्रकरणातील आरोपी आता सापडण्याची आशा आहे, अशी मागणी केल्याचेही धस यांनी सांगितले.
सुरेश धस यांच्या प्रमाणेच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनीही पोलिसांनी त्यांची बदनामी करण्याचा कट रचला होता, असा खुलासा केला आहे. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती त्यांचा मृतदेह सापडल्यानंतर तो केज ऐवजी कळंब च्या दिशेने घेऊन जाण्याचा व त्या ठिकाणी एका महिलेच्या माध्यमातून या प्रकरणाला वेगळेच वळण देण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र पोलिसांच्या गाडीमागे गावातील तरुणांच्या गाड्या असल्याने हा प्लॅन फसल्याचे धनंजय देशमुख म्हटले आहे.
Marathi e-Batmya