समृध्दीला दिलेले बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वगळले? मुख्यमंत्री शिंदेंकडूनच उल्लेख नाही महाराष्ट्राच्या विकासाचा साक्षीदार अन् शेतकऱ्यांच्या उन्नतीचा ठरेल

तत्कालीन मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने समृध्दी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देत त्यास राज्य मंत्रिमंडळाची मान्यता घेत शासन निर्णयही जारी करण्यात आला. मात्र आता शिवसेनेत केलेल्या बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र आज झालेल्या एका कार्यक्रमात बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्ग असा उल्लेख करण्याऐवजी फक्त समृध्दी महामार्ग असा भाषणातच उल्लेख केला.

त्यामुळे एकाबाजूला शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घेत असताना त्यांच्याकडूनच बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे राजकिय वर्तुळात याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचे प्रसिध्दी पत्रक मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आले. त्यातच शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. वाचा मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रसिध्दी पत्रक खालील प्रमाणे…

महाराष्ट्र हे देशाचे विकास इंजिन कायमच राहिले आहे. महाराष्ट्रात वेगाने विकास होण्याची क्षमता असून महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनामार्फत संपूर्ण प्रोत्साहन दिले जाईल. वेगवेगळया उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी महाराष्ट्रात येण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल. महाराष्ट्राच्या प्रगतीचा आणि विकासाचा साक्षीदार ठरणाऱ्या समृध्दी महामार्गाचा एक टप्पा लवकरच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत आजादी का अमृत महोत्सवअंतर्गत संकल्प ते सिध्दी (नवा भारत, नवे संकल्प) परिषद आज सकाळी हॉटेल द ताजमहल पॅलेस येथे आयोजित करण्यात आली होती. या परिषदेस प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सांस्कृतिक कार्य आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्यासह सीआयआयचे पदाधिकारी यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आज आपण देशाचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना भारताच्या येणाऱ्या पुढच्या २५ वर्षात नेमकी काय प्रगती आणि विकास करायचा आहे याचे नियोजन करणे आवश्यक आहे. समतोल विकास साधत असताना पायाभूत सुविधांसह राज्यातील प्रत्येक क्षेत्रावर लक्ष देण्यात येणार आहे. महाराष्ट्र हे जसे संतांची आणि देवांची भूमी म्हणून ओळखली जाते तसेच महाराष्ट्राची उद्योग आणि पायाभूत सुविधांमध्ये अग्रेसर असे राज्य अशी सुध्दा ओळख असून ही ओळख कायम टिकविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने गेल्या पाच वर्षात समृध्दी महामार्गाचे काम पूर्ण करण्याबरोबरच खालापूर ते सिंहगड येथे सर्वात मोठा बोगदा बांधण्याचे काम पूर्ण केले आहे. हा बोगदा बांधण्यात आल्याने आता मुंबईहून पुण्याला जाताना वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे. आजच्या काळात राज्याची प्रगती ही पायाभूत सुविधांचे जाळे किती विकसित आहे यावरुन ठरत असते असे म्हटले जाते. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्या काळात रस्त्यांचे आणि पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारीकरण यावर भर देण्यात येणार आहे.

मी मुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमात उद्योजकांना भेटत असून येणाऱ्या काळात कौशल्य विकास, कृषी या क्षेत्रास महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी या उद्योजकांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी योवळी केले. पेट्रोलचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोलला पर्याय म्हणून इथेनॉलचा वापर करण्यासाठी महाराष्ट्राने पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांचे मत, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुलेंच्या विचारांची आजच्या काळातही नितांत गरज क्रांतिसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षानिमित्त काँग्रेस पक्ष वर्षभर विविध उपक्रम राबविणार; बारामतीतून उमेदवारी अर्ज माघारी घेतला पण पाठिंबा दिलेला नाही;

महात्मा ज्योतीबा फुले यांचे महाराष्ट्रासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. सत्यशोधक चळवळ, पुरोगामी चळवळीचा वारसा, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *