ठाकरेंच्या आव्हानावर शिंदे गटाच्या संजय गायकवाडांचे प्रतिआव्हान, एक तरी पुरावा दाखवा

नुकत्याच चिखली येथे झालेल्या सभेत उध्दव ठाकरे यांनी शिंदे गटाला आव्हान देत म्हणाले काही जण रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. हे मी म्हणालो नाही तर त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचे म्हणाले. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल तर जाहिर सांगावं की, ते भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणार नाही असे आव्हान शिंदे गटाला दिले. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उध्दव ठाकरे यांनाच प्रतिआव्हान देत जर तुमच्याकडे सीआयडी सारखी यंत्रणा असतील त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केले तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिध्द करून दाखवावे असे खुले आव्हानच दिले.

संजय गायकवाड हे एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. त्यावेळी संजय गायकवाड पुढे म्हणाले की, पहिली गोष्ट तर शेतकऱ्यांचा मेळावा म्हणून त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं. पण जेवढ्या लोकांनी तिथे भाषण केलं, त्यातलं कुणीही शेतकऱ्यांविषयी बोललं नाही. शेतकऱ्यांच्या व्यथा, दु:ख, अडचणी किंवा शेतकऱ्यांच्या बाबतीत शासनानं काय करावं, यावर विरोधी पक्ष म्हणून ते काहीही बोलू शकले नाहीत. जे बोलले, त्यात खोके, बोके याशिवाय त्यांच्याकडे दुसरा कुठला विषयच नव्हता. त्यामुळे त्या शेतकरी मेळाव्यातून काही निष्पन्न झालं असं काही दिसलं नाही, असे म्हणाले.

खोके आणि बोके.. खोक्यांशिवाय गेल्या तीन-चार महिन्यांत त्यांना दुसरा कुठला विषय मांडता आला का? उद्धव ठाकरेंनी सीआयडी वगैरे जेवढ्या यंत्रणा असतील, त्या लावून या खोक्यांचा एक तरी पुरावा आणून दाखवावा. जर त्यांनी असं केलं, तर आयुष्यभर आम्ही त्यांचे पाय चेपत बसू. त्यांनी फक्त एकदा हे सिद्ध करून दाखवावं, असे आव्हानही त्यांनी  उद्धव ठाकरेंना दिले.

त्यांच्या यंत्रणांना या ४० खोक्यांचा शोध घ्यावा लागेल. पण एवढं मात्र नक्की आहे की मातोश्रीवर आत्तापर्यंत जेवढे खोके गेलेत, त्याच्या एक टक्क्यांमध्येही आमचा विषय नाही, अशा शब्दांत संजय गायकवाड यांनी सूचक विधान केले.

About Editor

Check Also

मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी आपत्कालिन सूचना मुंबई जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, पोलीस नियंत्रण कक्ष सज्ज

मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व महाराष्ट्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *