मध्यंतरी मुस्लिम समाजातील काही जणांना शिवसेना उबाठाला मतदान केले म्हणून एशंशि (शिवसेना शिंदे) यांना मिर्च्या झोंबल्या. त्यावरून भाजपाचे बिहार आणि अन्य राज्यातील विधानसभा निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर सौगात -ए-मोदी पाठविण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मग लोकसभा निवडणूकीत तुमच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून त्यांना देणार असल्याचे वक्तव्य करणाऱ्यांनी मग हिंदूत्व सोडलं का असा सवाल माझा असून सौगात-ए-मोदी की, सौगात-ए-सत्ता असा सवाल करत तेथील सत्तेसाठी हे सगळं भाजपाकडून करण्यात येत असून जे काही टोपी घालून फिरणारे उडाणटप्पू ज्यांचं योग्य नाव अनिल परब यांनी विधान परिषदेत ठेवलं ते ही सौगात घेऊन जाणार कसे असा खोचक सवालही शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
मुंबईतील दादर येथील शिवसेना भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणून मिरवणाऱ्या भाजपाच्या या कृतीला “सौगात-ए-सत्ता” संबोधत ठाकरे यांनी या उपक्रमामागील राजकीय भूमिकेवर बोट ठेवत म्हणाले की, होळी झाली, त्यावेळी सर्व हिंदूना पुरणपोळी प्रत्येकाच्या घरी द्यावे असे का वाटले नाही ईद च्या तोंडावरच सौगात ए मोदी ही संकल्पना कशी आली असा सवालही यावेळी केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपर्यंतच हे असणार आहे की, यापुढेही हे चालणार आहे? हे भाजपाने स्पष्ट करावे, त्याचबरोबर ही भूमिका फक्त निवडणूका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेली आहे का की हा कायम स्वरूपी बदल झाला असा थेट सवाल भाजपाला विचारला.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या भाजपाने मुस्लिम मतदारांनी आम्हाला (शिवसेनेला) पाठिंबा दिल्यावर “सत्ता जिहाद” असा आरोप केला होता, तेच आता ईदच्या निमित्ताने ३२ की ३५ लाख मुस्लिम कुटुंबांच्या घरी जाऊन सौगात वाटप करत आहेत. “ही केवळ बेशरमपणाची कृती आहे,” अशी खोचक टीका करत “आम्हाला हिंदुत्व सोडले म्हणणारे उडाणटप्पू आता मोदींची सौगात कशी घेऊन जातात, हे पाहायचे आहे,” असा उपरोधिक टोला लगावत आता “भाजपने हिंदुत्व सोडले आहे का?” असा सवालही यावेळी केला.
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, “जे लोक मला हिंदुत्व सोडल्याचा आरोप करतात, त्यांनी आधी आपल्या झेंड्यातील हिरवा रंग काढावा. आता हिंदू महिलांच्या मंगळसूत्रांचे रक्षण कोण करणार? खरे हिंदुत्ववादी पक्ष आता शिल्लक राहिले आहेत का?” असा सवाल करत भाजपा नेत्यांवर “टोपी घालणारे उडाणटप्पू” असा आरोप केला.
मुंबई #LIVE | पत्रकार परिषद | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | शिवसेना भवन, दादर https://t.co/bgjtLDrANc
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) March 27, 2025
मुस्लिम समाजाबद्दल सतत टीका करणाऱ्यांचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे लोक कालपर्यंत मुस्लिमांविरोधात आग ओकत होते, ते आता टोपी घालून सौगात वाटप करत आहेत. ही दुटप्पी भूमिका आहे, “सौगात-ए-सत्ता फक्त बिहार आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपुरते आहे की पुढेही चालणार, हे भाजपाने स्पष्ट करावे असे आवाहन करत भाजपाने जाहीरपणे सांगावे की त्यांनी हिंदुत्व सोडले आहे.
भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने २५ मार्च २०२५ रोजी ‘सौगात-ए-मोदी’ उपक्रमाची सुरुवात केली. या अंतर्गत देशभरातील ३२ लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना ईद साजरी करण्यासाठी विशेष किट्स वाटप करण्यात येणार आहेत. या किट्समध्ये खजूर, सेवई, सलवार-कमीज, कुर्ता-पायजामा आणि ड्राय फ्रूट्स यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने राबवला जात असून, यामागे मुस्लिम समुदायाशी संबंध सुधारण्याचा हेतू असल्याचा दावा भाजपने केला आहे. मात्र, हा उपक्रम बिहार आणि उत्तर प्रदेशातील आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी या उपक्रमाला “सौगात-ए-सत्ता” संबोधत त्यामागील राजकीय हेतूंवर बोट ठेवले. “हा उपक्रम केवळ निवडणुकीपुरता आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपने ही खेळी खेळली आहे,”. ज्या भाजपाने मुस्लिम समुदायाला नेहमीच लक्ष्य केले, त्यांच्या घरांचे बुलडोझरने विध्वंस केले, आता तेच लोक सौगात घेऊन त्यांच्या दारात पोहोचत आहेत. “हा निव्वळ ढोंगीपणा आहे” अशी टीकाही यावेळी केली.
दरम्यान, उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, राज्यातील अर्थसंकल्प हा खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा असा अर्थसंकल्प सादर करण्यात आला अशी टीका करत वारेमाप घोषणा करण्यात आल्या. पण त्यासाठी लागणारा पैसा कोठे आहे असा सवाल करत जयंत पाटील यांनी म्हटल्याप्रमाणे, या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे फलित म्हणजे कबर ते कामरा इतकेच आहे. आतापर्यंत शांत राहिलेल्या नागपूरात दंगल झाली. पण कोणे एकेकाळी बटेंगे ते कटेंगे म्हणणाऱ्यांकडून सौगात ए मोदी कसे पोहोचवले जाणार असा सवालही यावेळी केला.
Marathi e-Batmya