गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे. या घटना सतत घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, सतत होणारे हे अपघात मानवी चूक नसून पूर्णपणे सरकार आणि प्रशासनाची चूक आहे. अकुशल कामगारांच्या हाती ५०० किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेतली न जाणे, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध न करून देता त्यांना काम करायला लावणे अश्या बेजबाबदारपणाला कंपनी व्यवस्थापना सोबतच सरकारची प्रशासकीय व्यवस्था सुद्धा जबाबदार असल्याचा आरोप केली.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्फोट झाल्यानंतर जखमींना तात्काळ मदत मिळणे आवश्यक असताना दीड तासाने रुग्णवाहिका मदतीला पोहचते हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. यामुळे निष्पाप कामगारांचा जीव गेला आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाकडे फक्त जाब मागून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने आणि प्रशासकीय यंत्रणेने यावेळी करू नये अशी तंबीही यावेळी देत राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभाग कुठे झोपी गेले याचे उत्तर सरकारने द्यावे असा खोचक टोलाही यावेळी लगावला.
Marathi e-Batmya