मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील विविध पूर्व आयएएस प्रशिक्षण केंद्रात अल्पसंख्याक विद्यार्थीही तयारी करत आहेत. मात्र या विद्यार्थ्यांना इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत अल्पसंख्याकांना निवास आणि भोजनासाठी अवघे २००० रूपये मिळत असे. आता त्यात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी घेतला असून आता या विद्यार्थ्यांना ४ हजार रूपयांचे विद्यावेतन मिळणार आहे.
अल्पसंख्याक मुलांच्या विद्यावेतनात २ हजार रुपये वाढ करण्याची मागणी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने केली होती. त्याअनुषंगाने आज मंत्रालयात मंत्री नवाब मलिक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष रोहित ढाले, कार्याध्यक्ष सचिन काकड, सचिव विकास पटेकर आणि अल्पसंख्याक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती, कोल्हापूर या सहा ठिकाणी भारतातील प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रे (पीआयटीसी) आहेत. या सर्व केंद्रात सन २०१८ पासून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. ४००० देण्यात येते. मात्र अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सुधारीत दराप्रमाणे विद्यावेतन न देता केवळ दरमहा रु. २००० प्रमाणे विद्यावेतन देण्यात येते. स्वतःचा निवास व भोजन खर्च भागवण्यासाठी रु. २००० ही अत्यंत तुटपुंजी रक्कम असल्याची बाब अध्यक्ष रोहित ढाले यांनी मंत्री मलिक यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यामुळे या मुलांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. मात्र आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या विद्यावेतनात २ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार असल्याचे त्यानी सांगितले.
या विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाचा प्रश्न आणि इतर अनेक समस्यांबाबत छात्र भारती पाठपुरावा करत राहणार असल्याचे ढाले यांनी सांगितले.
Marathi e-Batmya