अजित पवारांचा गौप्यस्फोट, लॉबीतच फडणवीसांचे स्वपक्षीयांना होते आदेश अर्थसंकल्प सुरु होताच… अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मंत्रालय आणि विधिमंडळात आयोजित पत्रकार परिषदेत दिली माहिती

राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर केला. त्यानंतर अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया देण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधान भवनातील मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी सभागृहाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या शिंदे गटाच्या शिवसेना आणि भाजपा आमदारांना दिलेल्या आदेशाची आणि धमकीची माहितीच दिली.

यावेळी माहिती देताना अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी आमदारांसाठी असलेल्या सभागृहाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या आमदारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दात आदेश दिले की, अर्थसंकल्प सुरु झाला की तुम्ही सतत बाके वाजवून स्वागत करायचे आणि लोकानुनयी घोषणा केली की वाह वाह अशी वाहवा करायची असे आदेश दिले होते. तसेच अर्थसंकल्प संपला की फटाके वाजवायचे, फलक लावायचे आणि मिठाई वाटायची असे स्पष्ट निर्देशच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेल्या एका आमदाराने दिल्याचे अजित पवारांनी सांगितले.

फडणवीसांच्या या आदेशामुळेच भाजपाचे आमदार योगेश सागर तर सारखे वाह क्या बात है, वाह वाह म्हणत होते. तर सत्ताधारी बाकावरील इतर सदस्य सातत्याने बाके वाजवून स्वागत करत होते अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

अर्थसंकल्प सुरु होण्याआधी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती देताना अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्पावेळी सत्ताधाऱ्यांनी आम्हाला विचारणा केली होती. तुम्ही शांतपणे अर्थसंकल्प सादर करू देणार का? त्यावर मी (अजित पवार) अर्थसंकल्प सादर करताना जसा तुम्ही गोंधळ घातला तसे आम्ही करणार नाही. मात्र शेतकऱ्यांना तातडीची मदत जाहिर करा अशी मागणी केली. जर तशी घोषणा नाही केली तर आम्ही गोंधळ घालू असे स्पष्टपणे सांगितले होते. त्यावर सत्ताधाऱ्यांनी आम्हाला धमकीच दिली की तुम्ही गोंधळ घालाल तर आम्ही गोंधळ घालणाऱ्या प्रत्येक आमदाराला निलंबित करू असेही अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना म्हणाले अजित पवार यांनी टीका करताना म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा फार अभ्यासू आणि सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली असून त्यांनी अर्थसंकल्प कसा वाचावा याविषयी पुस्तक लिहिले. मात्र अर्थसंकल्प कसा लिहावा हे अद्याप त्यांना समजलेले दिसत नाही असा उपरोधिक टोलाही फडणवीसांना लगावला.

यावेळच्या अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत उल्लेख नसल्याची बाब प्रसारमाध्यमांशी अजित पवार यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले, वास्तविक पाहता त्यांना (सत्ताधारी भाजपा) यांना सर्वोच्च न्यायालयात हवे असलेले निर्णय कसे पटापट होतात आणि याचाच (शिंदे गटा) च्याबाबतीत कसा लगेच निर्णय होत नाही असे सूचक वक्तव्य केले. तसेच स्मारकाबाबतही त्यांनी असाच निर्णय लावून घेऊन याचे क्रेडिट घ्यायला हरकत नव्हती असा उपरोधिक टीकाही केली.

About Editor

Check Also

आता भारतीयांच्या स्वयंपाकघरासाठी पाण्यावर चालणारा स्टोव्ह पण सर्वसामान्यांना न परवडणारा

भारतातील एक नवीन हायड्रोजन कुकिंग स्टोव्ह एलपीजी सिलिंडर पूर्णपणे काढून टाकून स्वयंपाकघराच्या कार्यपद्धतीचा पुनर्विचार करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *