मागील दोन वर्षापासून राज्यातील जनतेचे कोरोना संसर्गजन्य आजारापासून बचाव व्हावा या उद्देशाने राज्यात एपिडमिक अॅक्ट (Epidemic Act) आणि आपतकालीन कायदा (Disaster management act) लागू करण्यात आला होता. मात्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत या दोन्ही कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असून मास्क मुक्तीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयानुसार मास्क घालणे बंधऩकारक नाही. मात्र मास्क परिधान करणे ऐच्छिक असून या निर्णयाची अंमलबजावणी २ एप्रिल पासून होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
देशात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यापूर्वीच मास्कबाबत निर्णय जाहीर केला असून केंद्राच्या निर्णयानुसार मास्क वापरणे ऐच्छिक करण्यात आले आहे. परंतु महाराष्ट्रात केंद्राच्या या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नव्हती. मात्र मागील दोन तीन महिन्यात कोरोनाची रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. तसेच बाधीतांच्या संख्येवर चांगलेच नियंत्रण मिळविले होते. तसेच चौथ्या लाटेची शक्यताही दिसून येत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आता गुढी पाडव्याच्या दिवशी शोभा यात्रेचे आयोजन करता येणे शक्य आहे. तसेच रमजान सण आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आता उस्ताहात साजरी करता येणार आहे. त्याचबरोबर ते दोन कायदेही आता राज्यात स्थगित करण्यात आल्याने मास्क जरी नाहगी घातला तरी आता नागरीकांना दंड आकारला जाणार नाही. मात्र स्वतःची आणि इतरांची सुरक्षा म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा असे आवाहन त्यांनी केली.
याशिवाय राज्यातील २२ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ज्यांचे वय ४० वर्षापेक्षा जास्त आहे. तसेच ५० ते ६० वर्षे वय असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना पाच हजार रूपये पर्यंतच्या चाचण्या मोफत करण्याची सुविधा लागू करण्यात आली आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून १०५ कोटी रूपयांची तरतूद करण्यासाठी आहे. तसेच ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना त्या चाचण्या दरवर्षी करणे बंधऩकारक करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
Marathi e-Batmya