औरंगाबादः जगदीश कस्तुरे
कोल्हापूर, सांगली आणि कराड परिसरात आलेला महापूर हा कृष्णा खोरे विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापनाचे नियम पाळले नाहीत. त्यामुळे या भागात महापूर आल्याने या गलथान कारभाराच्या विरोधात कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या विरोधात औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार असल्याची घोषणा औरंगाबाद जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र दाते -पाटील यांनी केली.
राज्यातील भीषण पूरस्थितीला निसर्ग नव्हे प्रशासन जवाबदार असून मानव निर्मित महापूराचा शोध घ्यावाच लागणार आहे. आता शासन यात काही करेल असे अजिबात मानता येणार नाही म्हणून याप्रकरणाची उच्चस्तरीय कमिटीच्या माध्यमातून किंवा उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशाकडुन निर्धारीत वेळेत “आपत्ती व्यवस्थापन आणि त्रुटी” यामुद्यावर चौकशी होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्यातील बसवाना बागेवाडी येथील कृष्णा नदीवर अलमट्टी धरण आहे. त्याची लांबी 1564.83 मीटर आणि उंची 49.29 मीटर असुन पाणी साठवण 110 टी.एम.सी.पर्यंतच पाणी साठवले जाऊ शकते. या धरणाला दोन कालवे असुन डावा कालवा लाभक्षेत्र 20235 हेक्टर तर उजवा कालवा 16,100 हेक्टर इतका आहे. अलमट्टी-सांगली -कोयना या तिन्ही अंगाचा विचार होणे गरजेचे आहे. कारण हा सवाल कृष्णा पाणी तंटा लवादा समोर गेलेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
अनेक वर्षापासुन सर्व संकेत दुर्लक्षित केल्याचा परिणाम हा महापुराच्या स्वरूपात आपल्याला पाह्यला मिळाले आहे. दरवर्षी ३० जुलै नंतर प्रत्येक पंधरवड्यात धरणांचा आणि त्यामधील उपलब्ध पाण्याचा हिशेब राखण्यासाठी आढावा घेतांना ३० जुलै रोजी जर का ५० टक्केच्या पुढे पाण्याने ते धरण भरलेले असल्यास अतिरिक्त पाणी सोडतांना खालील भागातील धरणात ते पाणी सोडावे आणि वरील धरणात २० टक्के पेक्षा जास्त साठा करावा आणि त्या पेक्षा जास्त पाणी खालील धरणात सोडावे आणि हे कार्य सातत्याने दरवर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आढावा घेऊन करावे असे स्पष्ट निर्देश सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. मात्र यापध्दतीने कोणत्याही स्वरूपाचे काम या कार्पोरेशनकडून झालेले नसल्याचा आरोप त्यांनी केला.
याबाबत बोलताना महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी म्हणाले की, कृष्णा खोरे विकास महामंडळाने आपत्ती व्यवस्थापनाचे सर्व नियम पाळलेले आहेत. तरीही निसर्गाचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे महापुराचा फटका जनतेला बसला.
Marathi e-Batmya